Tuesday 2 July 2024

वारी नव्हे जीवन जगतानाचं सिंहावलोकनच!

"वारी" म्हणजे पायी भावनापूर्ण अंत:करणानं केलेली तीर्थयात्रा!  महाराष्ट्रातील पंढरीची वारी एक अद्भुत अनुभूती आहे. अंतरंगात डोकावण्याची क्रिया म्हणजे वारी. भगवंतांनी कलीयुगात जगताना तरण्यासाठी नामस्मरणाचा रामबाण ऊपाय आपल्या सारख्यांना शिकवलाय. 

महाराष्ट्रातील ही ७०० वर्षांपूर्वी पासुनची परंपरा आजही या वारकरी भक्तांमुळे सतत अविरत सुरू आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही टिकुन राहण्यामागे या वारकरी संप्रदायाचे अनंत आभारच मानले पाहिजेत. वारीच्या महिन्या व्यतिरिक्त ही मंडळी शेती पिकवुन कष्ट करून जगाला अन्न पुरवते. जास्तकरून या संप्रदायात शेतकरी जास्त आहेत अस जाणवलं.

सलग तीन वर्ष आळंदी पुणे पायी वारी करून फक्त एक दिवस वारकरी संप्रदायातला आनंद आणि शारीरिक क्षमतेचे अतिउच्च टोक काय आहे ते अनुभवले. त्यांच्या त्या अफाट क्षमतेला, त्याच्या निर्धाराला, त्यांच्या भगवंत भेटीच्या ओढीला तसेच  हे करतानाही जीवनातल्या सहजतेला मनापासून मुजरा! दरवर्षी अधिकाधिक क्षमतेचे वारकरीत्व मी अनुभवले.  सर्व सामान्य आपण साधी व्रतं, कुळाचार, सांस्कृतिक परंपरा पाळताना स्वत:ला महान समजतो परंतु पिढीजात चालत आलेली वारीची परंपरा पाळताना तो अभिमान नखात सुद्धा त्यांच्यात दिसत नाही. वारीच्या या महिनाभरात जे मिळेत ते खाऊन (विना मांसाहार) भगवत भक्तीत लीन राहुन नामस्मरण, भजन, अभंगाचा गजर करत, कमीत कमी गरजा आणि भगवंताचं अस्तित्व मान्य करत जगल तर आयुष्य अधिक सुकर आहे हेच ते सुचवतात.

काय शिकवते वारी? का जावसं वाटत एक दिवस तरी त्यांच्यात? काय मिळत दिवसभर तंगडीतोड करून?  अशा व्यवहारीक प्रश्नांना हेच ऊत्तर की माणुसकी शिकवते वारी, मानवता धर्म शिकवते वारी, प्रयत्न केल्यावरही आशिर्वादाची झालर महत्वाची असते हे शिकवते वारी, माणसांतला देव बघायला शिकवते वारी, तंगडेतोड नव्हे-  फुकट मिळालेल्या शरीराची किंमत शिकवते वारी, वसुदैव कुटुंबकम हा विचार रूजवते वारी, परमेश्वराचा ध्यास आणि त्यासाठी  लागणारी प्रचंड सकारात्मकता आणि ध्येयाची कास घ्यायला शिकवले वारी!

त्या पांडुरंगाची कृपाच ज्यानं हा बहुमूल्य एकीचा, भक्तीचा, नामाचा मार्ग कलीयुगातल्या आपल्या लेकरांना दाखवलाय. अचानक आयुष्यात आलेल्या व्यक्तीला आपलस करून प्रत्येक मानव हा परमेश्वराचा अंश आहे ही शिकवण माऊली माऊली म्हणत आपण अंगिकारतो..  एक दिवस तरी का होईना मानव मानवातल्या परमेश्वराला नमस्कार करतो. यंदाची आय टी दिंडी भरभरून ऊत्साहात होती. संख्या गतवर्षी पेक्षा दुप्पट होती हेच लक्षण आहे की मानवास हळूहळू नामस्मरणाचा आनंद समजु लागला आहे.  नामस्मरणाच महत्वं, परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आणि वसुदैव कुटुंबकम भावना अशीच दृढ होत राहिली तर येणारी पुढची प्रत्येक पिढी ऊत्तमच ऊपजणार याची निश्चिंती.

पहाटे साडे तीन ते संध्याकाळी साडेचार पर्यंत आय टी दिंडी हेच विश्व होऊन जातं. नाश्ता आणि वाॅशरूमची रांग गडबड बरच काही शिकवुन जाते.आपले लोक पुढ माग झाले की गलबलतं. अनोळखी असुनही घट्ट सहकारी असल्या सारखं जेवताना गंधमनगर निनादून जातं. 

आय टी दिंडीतल्या सर्व माऊलींचे मनापासून आभार. या दिंडीची कल्पना सुचणारे तसेच ती सुरू राहण्यात सातत्य ठेवणारे सर्व माऊली तुमचे कोटी कोटी धन्यवाद.
यंदा खरच अस वाटल की हा भावना आणि भक्ती चा महापूर पंढरपूरला पोचलेला कसा असेल?  कल्पनेनच गहिवर येतो आणि डोळे मिटून मला मी याच दिंडीत मनान पुढ पुढं जाताना दिसते.

गत सालाप्रमाणेच पुढचे पंधरा दिवस याच मंतरलेल्या भावना बॅक ऑफ द माइंड असणार आणि तो आषाढी एकादशीचा दिवस मी आळंदी पुणे आय टी दिंडीच्या सहकारी माऊलींना मिस करणार यात वादच नाही.

विठुमाऊली आमच्या कडुन अशीच योग्य कर्म करवुन घेवोत आणि नामस्मरणाच्या त्या माळेतला एकेक मणी म्हणुन आम्हा सर्वांना गुफून ठेवो हीच प्रार्थना!

राम कृष्ण हरी!!
सौ. गौरी पाठक 
३०.०६.२०२४
आळंदी ते पुणे पायी वारी 

विठ्ठलाशी नाते माझे!
पालखी म्हटलं कि पुण्यात उत्साहाचं वातावरण कायम असतंच. न कळत्या वयापासूनच पालखीच्या दर्शनाला जाण्याचा योग्य येत आला. लक्ष्मी रोडवर कितीही गर्दी असली तरीही बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन करवून आणणारच. तेव्हा एवढच कळायचं कि हे केलं कि बाबा खूप आनंदात असतात. रात्री जेवणं झाली कि आमचा पूर्ण वाडा अनवाणी निवडुंग्या विठोबा देवळात पालखीचे दर्शन घ्यायला जायचा. जीवनाचा एक भागच होता तो तेव्हा.  एखादी गोष्ट आपण करतो , ती करावीशी वाटते यामागे खूप आधी पासून तयारी आत सुरु असावी असं मला वाटत. लहानपणीच्या बाबांच्या आनंदच रहस्य पालखीत आहे हे कुठंतरी अंतर्मनात नोंद होती. थोडा भाग तरी पायी वारी करावी अशी मनातली सुप्त इच्छेचं बीज तेव्हाच मनात रुजलं असावं. नैतिक जबाबदारी पार पडत असताना याच गोष्टी पुढे आध्यात्मिक आवड उत्पन्न करत असाव्यात. २०२२ साली मनाचा हिया करून नोकरी सांभाळून मनाची तयारी करत वारीचा आळंदी पुणे टप्पा पायी करावा हे ठरवलं.  गेले काही वर्षं दरवर्षी विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर महाराज यांच्या रांगोळ्या काढण्याची इच्छा झाली. प्रत्यक्ष हा देव कसा असेल याचा विचार सतत मनात आला कि मन तयार होऊन त्या काढल्या जायच्या. अशा अनेक गोष्टी एकत्र येऊन आळंदी ते पुणे पायी वारी करण्याचा मानस तयार झाला. इच्छा असली कि परमेश्वरच मार्ग दाखवतो. निसर्ग पण सहकार्य करतो. मुमुक्षी ग्रुपवर आयटी वारी दिंडी नोंदणी अशी लिंक आली आणि आनंदाला पारावर राहिला नाही. नवऱ्याला इच्छा बोलून दाखवली आणि तो तत्काळ जा म्हटलं. त्याच्या साथी शिवाय हे शक्यच नव्हते. 

काय असतं पंढरपूरला ? एवढे सगळे घरदार सोडून का जातात तिकडे ? असे अनंत प्रश्न जे मनात होते त्यांची समर्पक उत्तरं या पूर्ण पायी वारीत मला समजली. मग तिचा नाद लागला. ओढ वाटू लागली. पायी वारी कराताना थोरल्या भावासारखं तो सगळं जुळवून आणत असतो. योग्य माणसं, योग्य अनुभव, योग्य अनुभूती त्याच्या मुळेच समजत होत्या. विठ्ठलानं  वारीत  सर्वधर्म समभाव शिकवला. विश्व हे परमेश्वराच्याच अंशांनी जोडून बनलेले आहे हे पाहण्याची दृष्टी दिली. असे अनेक अंश मिळुन जेव्हा नामाचा गजर होतो तेव्हा समजली महती त्या पांडुरंगाच्या पंढरीची.  काय शिकवते वारी? का जावसं वाटत एक दिवस तरी त्यांच्यात? काय मिळत दिवसभर तंगडीतोड करून?  अशा व्यवहारीक प्रश्नांना हेच ऊत्तर की माणुसकी शिकवते वारी, मानवता धर्म शिकवते वारी, प्रयत्न केल्यावरही आशिर्वादाची झालर महत्वाची असते हे शिकवते वारी, माणसांतला देव बघायला शिकवते वारी, वसुदैव कुटुंबकम हा विचार रूजवते वारी, परमेश्वराचा ध्यास आणि त्यासाठी  लागणारी प्रचंड सकारात्मकता आणि ध्येयाची कास घ्यायला शिकवले वारी!  विश्वातल्या त्या आनंदाचा स्रोत दाखवते वारी. आपल्या कमीत कमी गरजा दाखवते वारी. तंगडेतोड नव्हे-  आपल्यातल्या परमेश्वराच्या अंशाचे मंदिर "देह" त्याची किंमत पटवते वारी. समर्पण शिकवते वारी. मोह त्यागून जगायला मार्ग दाखवते वारी. हे सगळं कोण शिकवत ? थोरला भाऊच कि. आयुष्यात हे सगळं शिकवणारा माझा पांडुरंग, यामुळेच मला थोरला भाऊच वाटतो. आयुष्यातला खरा आनंद घेताना मार्ग दाखवणारा हा पाठीराखा भाऊच जणू.  माझ्या थोरल्या भावाची ओळख मला आय टी दिंडीमुळे झाली.

पांडुरंगाला भेटायचं आनंद वारीत समजतो तो अद्भुत असतो. का गहिवरुन येतं ? का भावना आनंदाश्रूं मार्फत झरझर वाहू लागतात? माहेरी चाललेल्या माहेर वाशिणी सारखा तो असतो असाच मला वाटतं. विठ्ठलानी कलीयुगात जगताना तरण्यासाठी नामस्मरणाचा रामबाण ऊपाय दाखवलाय असाच मला वाटत. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही टिकुन ठेवण्याचा सल्लाच जणू तो मला देतो.  पंढापूर पर्यतच्या वारीचा विचार करता २१ कि मी आळंदी पुणे पायी वारी म्हणजे नखाच्या टोकावरचा अनुभव असा इतकाच म्हणावा लागेल. परंतु माझ्या सारख्या सर्वसामान्यास तो अनुभव पण दरवर्षी भरपुर शिकवुन जातो. . यावरूनच संपूर्ण पायी वारी करून घरी परतणारे पुण्यात्मे काय तेजाने झळकत घरी पोचत असतील याची स्पष्ट कल्पना येते.  पायी वारी करून फक्त एक दिवस वारकरी संप्रदायातला आनंद आणि शारीरिक क्षमतेचे अतिउच्च टोक काय आहे ते अनुभवते मी. त्यांच्या त्या अफाट क्षमतेला, त्याच्या निर्धाराला, त्यांच्या भगवंत भेटीच्या ओढीला तसेच  हे करतानाही जीवनातल्या सहजतेला मनापासून मुजरा! दरवर्षी अधिकाधिक क्षमतेचे वारकरीत्व मी अनुभवले. सर्व सामान्य आपण साधी व्रतं, कुळाचार, सांस्कृतिक परंपरा पाळताना स्वत:ला महान समजतो परंतु पिढीजात चालत आलेली वारीची परंपरा पाळताना तो अभिमान नखात सुद्धा त्यांच्यात दिसत नाही. थोरल्या भावासारखा तो हेच शिकवतो जणूं कि भगवत भक्तीत लीन राहुन नामस्मरण, भजन, अभंगाचा गजर करत, कमीत कमी गरजा आणि भगवंताचं अस्तित्व मान्य करत जगल तर आयुष्य अधिक सुकर आहे. 

अचानक आयुष्यात आलेल्या व्यक्तीला आपलस करायला शिकवतो तो विठ्ठल. एक दिवस तरी का होईना मानव मानवातल्या परमेश्वराला नमस्कार करतो आपण.  आय टी दिंडीतल्या सर्व माऊलींचे मनापासून आभार. या दिंडीची कल्पना सुचणारे तसेच ती सुरू राहण्यात सातत्य ठेवणारे सर्व माऊली तुमचे कोटी कोटी धन्यवाद. यंदा खरच अस वाटल की हा "भावना आणि भक्ती" चा महापूर पंढरपूरला पोचलेला कसा असेल?  कल्पनेनच गहिवर येतो आणि डोळे मिटून मला मी याच दिंडीत मनान पुढ पुढं जाताना दिसते. गत सालाप्रमाणेच पुढचे पंधरा दिवस याच मंतरलेल्या भावना बॅक ऑफ द माइंड असणार आणि तो आषाढी एकादशीचा दिवस मी आळंदी पुणे आय टी दिंडीच्या सहकारी माऊलींना मिस करणार यात वादच नाही. विठ्ठल रखुमाई...परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पंढरपूर पाहण्याची इच्छा मनात आली ती वारीमुळे. दोनदा आळंदी पुणे वारी त्यान घडवली आणि तो पांडुरंग बघायची इच्छा तीव्र झाली. यावर्षी मी जेव्हा पंढरपूरला गेले होते तेव्हाच तो पांडुरंग तो विठ्ठलच  जीवनात जगायचे योग्य मार्गदर्शन करत होता अगदी थोरल्या भाव सारखा हि खूणगाठ पटली. वारीत त्यानं आय ती दिंडीची माझी भेट घडवली होती ती या साठीच जणू!  पांडुरंगानी भरभरून दिलय, तो देत पण राहील. मला ते सांभाळायची योग्य कर्म करायची बुद्धी तेवढी लाभु  दे. योग्य विकल्प चयन करण्यासाठी कायम मार्ग दाखवू दे. विठुमाऊली आमच्या कडुन अशीच योग्य कर्म करवुन घेवोत आणि नामस्मरणाच्या त्या माळेतला एकेक मणी म्हणुन आम्हा सर्वांना गुफून ठेवो हीच प्रार्थना!

राम कृष्ण हरी!!
सौ. गौरी पाठक 
९९७०१६८०१४

###############
 लेख प्रसिद्ध झाल्यावरची वाचकांची प्रतिक्रिया:-
आज पाठीराखा पांडुरंगाच्या वारीचा अनुभव मधुरिमा दिव्या मराठी नियतकालिकात प्रसिद्ध झाला. मनातून मी त्या विठुरायाचे अनंत आभार मानले. त्याने बुद्धी दिली, त्यांनाच हे जगापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली, त्यांनच लिहून घेण्याचा वेळ काढायची क्षमता दिली, त्यांनाच ती प्रसिद्ध करायची वाट दाखवली. आत्तापर्यंत अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत पण यावेळी एक वेगळी अनुभूती जाणवली.
ब्रह्मविध्येच्या अभ्यासात कृतज्ञता, आभार, आदर, क्षमा, संतोष कसे बाळगावे ? का बाळगावे? अशी शिकवण देतात. हि शिकवण जगात किती लोक वापरतात याचा उत्तम अनुभव आज आला. सकाळी मधुरिमा दिव्या मराठी मध्ये लेख प्रसिद्ध झाल्यापासून अहमदनगर, औरंगाबाद, जालना, पंढरपूर, जळगाव अशा अनेक ठिकाणहून मला लेख आवडला असे फोने आले. 
एखादी गोष्ट आवडली, भावली कि त्याच्या कर्त्यास फोन करून सांगावे हा खूप सुरेख गुण यांच्यात दिसला. एखाद्यास छान म्हणायला सुद्धा मन मोठं लागत. यात कोणी वकील, कोणी शिक्षक, कोणी व्यापारी तर कोणी गृहिणी असेच होते. वेळात वेळ काढून लेख आवडला आणि तो का आवडला हे फोन मेसेज करून सांगणारे सर्व कौतुक करणारे करणारे भेटले.  जगात अशी मंडळी आहेत म्हणुन तर जग चालत असावं.
🙏🏻🚩
पुण्यासारख्या शहरातून नोकरी करणार्यांनी जर वारीचा काही भाग केला तर तो नक्की लोकांपर्यंत पोचलेच असा एका दादांचं म्हणणं होतं. त्यांना खूप घालमेल वाटत होती कि नवीन पिढी या ७०० वर्षाच्या परंपरेला मुकेल का ? त्यांना याची ओढ कशी लागेल ? शहरातील नोकरदार जर यात सहभागी झाले तर घरी मुलांना निदान नोंद होत राहील जेणे करून कालांतराने ते पण नामस्मरणाचा  अमृतानुभव घेतील. जसे मला माझ्या लहानपणीचे बाबा आठवले तसे आपण या पिढीने पण हे करत राहायला हवे. एका काकांना जगण्याची परिभाषा जी उल्लेखली आहे ती आवडली. एका दादांना वारीकरून आल्यावरचा सकाळी सकाळी सुरेख नजरिया जगण्याचा  वाचून छान वाटलं. जगण्याचाही उमेद देणारे वाचायला लाभले हि त्या पांडुरंगाची कृपा असा त्यांचं म्हणणं होतं. एक काकू म्हटल्या मी एकदा छोटा टप्पा केला पण आता मणका दुखतो खूप चाललो कि त्यासाठी आयटी दिंडी मदत करेल का मी? मला पुढच्या वर्षी यायचे आहे. मदत काय तर काही त्रास झाला तर तात्काळ दवाखाना किंवा डॉक्टर असतील ना वगैरे वगैरे. 
मधुरिमा दिव्या मराठीचा वाचक वर्ग खरंच कौतुकास्पद आहे. आपलं लिखाण, अनुभव आवडला असा फोन येणं हीच मोठी गोष्ट असते. जी एक लिहिणारा नक्की समजू शकेल. आता आयटी दिंडी च्या माउलींची जबाबदारी वाढली आहे. जसे दिंडीचे दादा म्हणाले कि धर्म वाचवला पाहिजे तो आपण पाळला तर थोडा तरी वाचेल. पिढीकडून तो आलाच पाहिजे असे नाही आपण पण पर्यंत करू शकतो. यासाठी हा आयटी दिंडी उपक्रम खरंच उपयुक्त आहे.  

राम कृष्ण हरी !
सौ. गौरी पाठक

2 comments:

  1. Gauri , you are prime mover for many ! Keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete