Wednesday 17 May 2023

अक्षय

१६ मे २०२३
आपण एखादी गोष्ट मनापासून करत करत करत राहिलो की त्यात रमतो, आपोआपच ती करताना आनंद लाभतो. गेल्या तीन -चार वर्षात भगवान श्रीकृष्णाची भगवत गीता वाचनात आली, त्यानंतर त्यासंदर्भात वाचन वाढत सर्व त्याचीच इच्छा हे पटायला लागलं. श्रीकृष्ण का आपलासा वाटतो? ते अनुभवानच समजत गेल.  माझ अचानक श्रीकृष्ण प्रेम वाढतय अस मला जिवलग मैत्रिणीकडुन पण समजलं, आणि आश्चर्य वाटले की खरच आवड बदललीय का आपली? ती पण एवढी की ती जिवलगास जाणवावी. हाच तर आहे भगवान श्रीकृष्ण!
मधे कधीतरी असच वाचनात आलेलं की अक्षय तृतियेला भगवान श्रीकृष्ण व इतर देवांना -चंदनाची उटी लावतात. आठवडाभर आधी पासून मनात येत होते की तो उटी पोशाख पाहावा. काही महिन्यांपासुन इस्कॉन कात्रजच देऊळ पाहाव ही इच्छा वरचे वर मनात येत होती. अक्षय तृतियेच्या दोन दिवस आधी ती इच्छा नवऱ्याला सांगितली. योगायोगानं अक्षय तृतीयेला सुटी आली आहे. लवकर उठुन जाऊन येऊ उन्हाच्या आधी असा विचार केला. इतकाच ना चल जाऊ म्हटला पण तो मला. रात्री दोघं बोललो सुद्धा, व्यायाम करून येतो तोवर आवर इतक सहज बोलणं झालं. त्यामुळे पहाटे ऐवजी सात-आठ ला जायच ठरलं आणि तो व्यायामाला गेला. 
मनात विचार आला हरकत नाही दर्शन होण महत्त्वाचं. आजचा दिवस हुकला नाही पाहिजे इतकच. इतक्यात कामवाली येणार नाही असा निरोप आला. जिवाच्या आकांताने तीची काम आटोपली. तोच नवरा दारात उभा, मग नाश्ता करून निघु म्हणतच दहा वाजले. सकाळी नाष्टा करताना  समजले की सकाळीच सासुबाइना दात दुखतोय तर दवाखान्यात जायची त्यावेळची गरज होती. श्रीकृष्ण, उटी, अक्षय तृतीया शब्द घुमत होते.. शेवटी मुलगा म्हटला आई तू जा मी आजीला दवाखान्यात नेतो. तेव्हा वाटलं तोच धावून आला. आता कोणता व्यत्यय नाही. आवरून निघालो साडे दहाला. तेवढ्यात नवरा म्हणाला बाराला मिटींग आहे आत्ता फोन आलाय, त्याआधी परत याव लागेल. अंतराचा वेळेचा आणि नशिबाचा  काहीच अंदाज नव्हता. मी ठिक आहे म्हणुन आम्ही दोघ कार आईसाठी ठेऊन बुलेटवर निघालो.
 आंबेगावपर्यंत पोचलो, चटका ऊन देह भाजवत होत. पुढं रस्ता कसा पाहायला रस्त्यात थांबलो आणि वीस मिनीटं अंतर गुगल वर दाखवत होत. पण जवळच आणखी दोन देवळं गुगलवर दाखवत होती. येऊन जाऊन बाराची मिटींग गाठण शक्य होणार नाही, आता या जवळच्या देवळतच जाऊ अस ठरलं.

मनात आलं  का अस झाले असेल? नुसतं दर्शन सुद्धा नशीबात नाही माझ्या? भगवान श्री कृष्णाची उटी पाहण्याचा योग नाही बहुतेक नशीबात. मन थोडं खट्टू झालं, पण सोबत यायला नेहमी तत्पर असणाऱ्या  नवऱ्याला बाराला जायच महत्त्वाच आहे हे पटतही होतं. ठिक आहे चल बघु हे कोणतं देऊळ आहे? अस म्हणत आम्ही चढ चढून कात्रजच्या जैन मंदिरात गेलो.

 कोणालाही दर्शन देण अथवा न देण हे पण तो परमेश्वरच ठरवतो हे पटले. आपण कितीही प्लॅनिंग करा जे योग्य तेच तो आपल्यासाठी करतो हा धडा आज घेतला.

कात्रजच जैन मंदिर - खुप सुरेखा आहे, मी आत जरी खट्टु मनानं गेले असले तरी आपला परिसर पाहुन मन हळू हळू हलकं होत होते. तिकडे कडक शिस्त होती. पाण्याची बाटली फोन काहीच आत नेण्यास परवानगी नव्हती. . चेहरा एक होता, मनातं एक वेगळाच  होतं आणि वागत भलतच होते अस काहीस चालु होतं.

आत जाताना डावीकडे एका स्वामींचा सुरेख देऊळ पाहिलं. स्वामींचे नाव तेव्हा पाठ नव्हतं. सुंदर सुबक कोरीव बोलकी मूर्ती होती. पुढे वर चढून जाताना मला नवरा म्हटलं दखल  की जाऊ परत इस्कॉन मधे, पण मी म्हटल बघु पुढच पुढे आता जाऊ दे. अस म्हणतच एक सुरेखा संगमरवरी देवाची मूर्ती असलेलं मोठठं देऊळ उजवीकडे आलं. देवासमोर गाभारा पण त्यामानानं मोठा होता.  रांगोळी काढतानाची देव निरखून बघायची सवय लागल्यानं मी मूर्ती निरखुन पाहु लागते. शांत मुद्रा, नागाचा फणा, सोनेरी कला वर्क पाहताना मन भरुन आल. मीच माझ्या मनाशी म्हणाले सगळे देव एकच भगवान श्रीकृष्ण काय आणि भगवान शंखखेश्वर पार्श्वनाथ काय.  अस म्हणतातच  ना कि देव सगळे सारखेच असतात. मग हाच माझा श्री कृष्ण आज!-- डोळे डबडबले---  आश्चर्य म्हणजे त्याक्षणी मला माझ्या घरची पांढरी संगमरवरी-श्रीकृष्णाची मूर्तीच तिकडे आहे असा भास झाला. आजही आठवते आणि आश्वर्य वाटतं, काटा येतो. ती डोळे भरून पाहत अवाक असतानाच पुजारी व्यक्ती आली.  पंचारती लावत ती  माझ्याकडे पाहात होती. दोन तीन माणस आली, ती पेहरावावरून त्यांची भक्त मंडळी आहेत हे समजत होत आणि आश्चर्य हे की त्या पुजाऱ्यांनी आरती आज आप करो म्हणून ती पंचारती मला दिली. मी हसले ती पण डबडबल्या डोळ्यानी अवाक् होऊन. मान डोलावली. पंचारती घेतली. दान पेटच्या पुढे गेले. आत्तापर्यतचे डबडबलेले डोळे वाट फुटेल तिकडे वाहू लागले.. घळाघळा अश्रुत मी आरती करत होते. तीर्थकर श्री शंखेश्वर पार्श्वनाथ यांच्या बद्दल विशेष माहित नव्हते. आरतीचे शब्द पण कळत नव्हते, पण भी पंचारती ओवाळत होते. अति उच्च आनंदाची अनुभुती काय असते ती आज अक्षय तृतिया दिवशी भी अनुभवत होते. तो माझा -श्रीकृष्ण पण नव्हता ते भगवान शंखेश्वर पण नव्हते तो परमेश्वर ती एकमेवादिवत्तीय शक्ती होती. ही आरती करायला लाभली हि कदाचित क्षुल्लक गोष्ट असेलही पण मला ती आज फार फार अमूल्य होती. पंचारती कापुर आरती झाली त्यांच्या शब्दात गजर केला, आरती  घेतली.  ती तीन माणसं आणि पुजारी गेले. मी मग मागे बघितलं आणि लक्षात आल नवरा तिकडे नाही. परत परत देव निरखून पाहत होते.  पण पाय निघत नव्हता. हे कोणते देव आहेत? तीर्थांकर का म्हणतात त्यांना असे अनेक प्रश्न मनात येत होते.  श्री शंखेश्वर पार्श्वनाथ यांचे मुळ देऊळ कुठे आहे? हा विचार मनात येत होता. 
परमेश्वराची आपल्या साठी योग्य योजना असते आपण ती समजण्याची कुवत ठेऊन नसतो. अतिशय शांत आणि प्रेमळ समाधानी मनानं मी पुढे जात होते. आता मनात भगवान श्रीकृष्णाची उटी पाहायला मिळाली  नाही दुःख नव्हतं. 
तो हाच समजुन नमस्कार केला तेव्हाचा आणि आताचा मनाचा खेळ वेगळा होता. सर्व तीर्थकरांची माहिती पुढे भिंतींवर लावलेली दिसली. मोठ्या गाभाऱ्यात पंच धातूच्या भगवान महावीर यांच्या मूर्तीवर अभिषेक सुरू होता, मी मनोभावे नमस्कार केला. भजन सुरु होता तिकडे.  बाहेर एक राजाच देऊळ होते. कोणत ? का? मला ठाऊक नाही. तिकडे नवरा भेटला. मी विचारलं कि तू आरतीला होतास ना? तर त्याला ती झाली हेच ठाऊक नाही म्हणाला कारण तो पुढे या मुख्य देवळात आला असावा.  प्रदक्षिणा पूर्ण होताच मी त्याचा हात धरून या देवाची आरती मला आत्ता करायला मिळाली आत्ता दहा मिनीटापूर्वी.  त्यालाही फार कौतुक वाटलं. परत खाली जल मंदिर आहे समजत होते पण तिकडे गेलो नाही.  ही जागाच खुप शांत निवांत होती. परत येऊ नक्की अस म्हणत बाहेर आलो तर सव्वा अकरा झाले होते. मग नवरा म्हणाला पाऊण तास आहे. चल तुला आज कृष्ण दाखवतोच . मी पटकन म्हटलं की आता मला काही कुठ जायची इच्छा नाही मी समाधानी आहे. तर म्हणे नाही -चलच स्वामी नारायण देऊळ बारा  मिनीटावर दाखवतय गुगलवर. तिकडे तुला कृष्ण दाखवतो. तुला वेळ होणार नसेल तर चल अस म्हणत आम्ही साडे अकराच्या दरम्यान श्री स्वामीनारायण यांच्या कात्रजच्या देवळात पत्ता शोधत पोचलो. प्रचंड मोठा परिसर अबब! भर दुपारच ऊन त्यातच गाडी पार्क करून पाय भाजतच मोठ्या पायऱ्या चढून वर गेलो. पावणे बारा झाले होते आम्ही आत पोचलो तेव्हा वाचल बाराला देऊळ बंद होतं. योगायोगच होता तो पण. 

इतक सुरेख आहे हे देऊळ काय सांगू! मारुती, गणपती, शंकर पार्वती, विष्णु आणि श्रीकृष्ण आणि श्रीराधा-ची सुंदर मनमोहक उटी पोषाख मूर्ती! काय वर्णू तो क्षण... त्या क्षणी सरकन अंगावर काटा आला. काय सांगू माझा देवच समोर मला बघायचा होता तस्साच समोर होता. आनंदाला पारावार नसणे हि म्हण भी अनुभवती.  खाली गर्भगृहात श्री स्वामीनारायण यांची तरुण वयातली मूर्ती अभिषेक सुरू होता जीला नीलकंठ वर्णी म्हणतात. स्वामी नारायण यांच्या बद्दल बरीच माहिती मिळाली. बारा वाजता बाहेर आलो. ताक प्यायतो आणि परत निघालो साडे बाराला घरी आलो, मिटींग तासभर पोस्टपोन झालीय हे स्वामी नारायण देवळाच्या पार्किंगमधे समजलं. आज मी फक्त हसले काय बोलू ? कोणास सांगु ? सांगून समजेल का? अस वाटलं. शांत बसले पण शोध सुरू होता. तीर्थकर शंखेश्वर पार्श्वनाथ यांचा.... मी आणि गुगल...  

जय श्रीकृष्ण

सौ. गौरी अ.पाठक ९९७०१६८०१४
अक्षय म्हणजे अनंत, अमर, अविनाशी हा अनुभव तसाच आहे मनात राहील अक्षय. 

Monday 15 May 2023

६) ज्येष्ठ (मे - जुन) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

ज्येष्ठ महिना महत्वं : 

या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला जेष्ठ महिना असे म्हणतात .वर्षातला सर्वात मोठा म्हणजेच जेष्ठ दिवस याच महिन्यात येतो म्हणूनही जेष्ठ महिन्याचे महत्व आहे.

ज्येष्ठ महिन्यातील सण :
गंगा दशहरा :  (
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा) ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा संपल्याचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा, हा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.


शिवराज्याभिषेक दिन : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ,(६ जून , १६७४) 

वट पौर्णिमा :  (ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ) सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||


ज्येष्ठ महिन्यातील यात्रा, जयंत्या :

कबीर जयंती :  महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर.

गायत्री जयंती : जेष्ठ शुद्ध एकादशी
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू : ज्येष्ठ कृष्ण सप्तमी.


संत
ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान,आळंदी : ज्येष्ठ कृष्ण अष्टमी


धर्मवीर संभाजी महाराज जयंती , ज्येष्ठ शुद्ध द्वादशी

 दर्श अमावस्या:  ज्येष्ठ महिन्याची अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. कारण यानंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांना वंदन करण्याच्या उद्देशाने ही अमावस्या विशेष मानली जाते. या अमावस्याला दर्श अमावस्या असेही म्हणतात

गीते, कविता, गाणी :
'पाहन पूजे हरि मिलैं, तो मैं पूजौं पहार।
वा ते तो चाकी भली, पीसी खाय संसार।।'
कबीर माया पापणी, फंध ले बैठी हटी ।
सब जग तौं फंधै पड्या, गया कबीरा काटी ||
अर्थ - कबीर दास जी कहते है की यह पापिन माया फंदा लेकर बाज़ार में आ बैठी है । इसने  बहुत लोगों पर  फंदा डाल दिया है , पर कबीर ने उसे काटकर साफ़ बाहर निकल आयें है । हरि भक्त पर फंदा डालने वाला खुद ही फंस जाता है ।

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥
चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥
--ज्ञानेश्वर माउली

 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावरी ठेवुनिया ॥१॥ 
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । 
कंठी कौस्तुभमणी विराजित ॥२॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । 
पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर । 
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

-- संत तुकाराम

लॉजिक नवीन पिढी साठी :

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व : पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे झाड विशेष आहे. वर्षात एकदा तरी याचा सहवास शारीरिक  सुधारणेला ऊपयुक्त असतो. या दिवसात झाडांना पाणी घालणे पण निसर्गाचे आभार मानल्यासारखेच आहे. पाणी हवा हे फुकट मिळणारे पदार्थ जपण काम आपलच आहे. त्यामुळे झाडाजवळ जाऊन पाणी घालुन आभार मानणे. त्या दिवशी बायकांनी ऊपवास करणे याला पण काही कारण आहे. ऊपवासामुळे  अग्नीपर्दीप्त होऊन आरोग्य टिकुन राहते. ऊप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कर्मेद्रीयाच्या आणि ऊभयात्मक मनाच्या जवळ जाणे म्हणजे ऊपवास करणे. आपलं लक्ष म्हणेच आपला वास म्हणजे consciousness आपले मन एकाग्र करणे हा खरा ऊपवास. वटपौर्णिमा बायकांनीच का करायचा ऊपवास यावर नेहमी चर्चा होते. सर्वसाधारणपणे रोजच्या कामात स्त्रीया जास्त क्रियाशील असतात त्यांना ऊपवासाचा फायदा होतो जो गरजेचा आहे ऊदा. ऊत्साही वाटणे, पित्त कमी होणे, रक्तशुद्धी होणे, एकाग्रता वाढणे. त्याकाळी स्त्रीया कष्टाची काम अधिक करावी लागत म्हणुन त्यांनी करावा अस असेल. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.