Thursday 14 October 2021

नवरंगांची गंमत

नवरंगांची गंमत

काही दिवसांपुर्वी एक मेसेज व्हाट्सअप वर फिरत होता. पुराणात रंग का आहेत त्याचं महत्वं काय असा उल्लेख नाही किंवा या दिवशी ह्या रंगाचे कपडे घाला असं म्हटलेलं नाही. मार्केटिंग चे फंडे आहेत वगैरे वगैरे. ते काही असलं तरी एकजुट दिसते रस्तावरून जाताना एका रंगाचे कपडे परीधान केलेल्या बायका पुरूष बघुन. एकत्र येऊन काहीतरी करण्याची संकल्पना मला आवडली म्हणुन मी पण रंग फाॅलो करतेच. कधीकधी तिथी दोन दिवस पडते मग जमेल फाॅलो करायचं.
 
पण रंगांची गंमत काय आहे, ते काय सांगतात याचा विचार या पोस्टमुळे केला गेला. मग विचार आला कि खरंच काय असतील गुपितं या रंगान मागची ? शोध सुरु केला. समजलेली माहित जमा करू लागले. आपण जे करतो त्यामागचा हेतु समजला की ते करायला अजुन ऊत्साह येतो. रंगांच महत्व जाणुन ते आचरणात आणुन वागुया अशी कल्पना तर करू शकतो.  शेवटी काय आनंदी राहणं महत्वाच!

नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस मा दुर्गाच्या अवताराला समर्पित आहे. प्रत्येक तिथीला नवदुर्गेचे एक रूप प्रतिकात्मक रंगाच महत्व दर्शवते, त्यात असणाऱ्या शक्तीचा या रंगाशी गुढ संबंध आहे. 

१) प्रतिपदेला पिवळा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो पिवळा रंग?
देवी शैलपुत्रीचा हा आवडता रंग. जो जगण्यातला  ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. शैलपुत्री ही पर्वतकन्या योगमार्गावरच्या चेतनेचे सर्वोच्च स्थान. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो.हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.


२) व्दितीयेला हिरवा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो हिरवा रंग ?
सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद, ताज्या दमाची शक्ती देवी ब्रह्मचारिणीच प्रतीक. म्हणुन तिचा आवडता रंग हिरवा.
३) तृतीयेला राखाडी रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो राखाडी रंग ?
देवी चंद्रघंटेचं हा प्रतीक, गडद रंग नकारात्मकता असूनही आवेशपूर्ण भाव  व त्यावर त्यातून निर्माण होणार निर्धार वाईटावर मात करण्याचा. वाईट वृतींचा नाश  सांगतो हा राखाडी रंग.
४) चतुर्थीला केशरी रंग महत्वाचा.
काय सांगतो केशरी रंग ?
ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे कुष्मांडा देवीचं, जी सुखी समाधानाचे संकेत देते.
५) पंचमीला पांढरा रंग महत्वाचा. 
काय सांगतो पांढरा रंग?
ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतक. देवी स्कंदमाता या दोन्हीच मिश्र तत्व जे पवित्रता, शांतता व ध्यान सुचक आहे.
६) षष्ठीला लाल रंगाच महत्वं आहे.
काय सांगतो लाल रंग?
शुरता, योद्धा, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती, देवीचा सकारात्मक क्रोध जो अन्याय, अज्ञान व दुष्टांवरील राग निर्भयता दाखवतो. देवी कात्यायनीच प्रतिक हा रंग.
७) सप्तमीला निळा रंग महत्वाचा. 
काय सांगतो निळा रंग?
अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक देवी कालरात्रिच आहे.
८) गुलाबी रंग अष्टमीचा.
महागौरीच प्रतिक गुलाबी रंग जी तत्पर आहे भक्तांच्या मनोकामना पुर्तीसाठी, दुःखातुन सुटका, नवी आशा, स्व शुद्धीकरण भावना, सामाजिक ऊन्नती दर्शवते.

९) नवमीला जांभळा रंग महत्वाचा.
काय सांगतो हा?
अलौकिक शक्ती देणारी सिद्धदात्री देवीच प्रतिक जांभळा, आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा प्रतिक.

रंग काय सांगतात, त्यांचे गुण काय ते समजुन ते अनुभवण्याचा प्रयत्न करू हीच या नवरात्रीतली शिकवण. काही ऊत्साही मैत्रिणींनी दिलेली साथ पण मोलाची आहे यात. सगळ्यांना धन्यवाद!

गौरी.

Monday 23 August 2021

माणसाच्या जंगलाला भेट Sipna - A man made Jungle

Sipna - A man made Jungle  सिपना वनराई
जंगल म्हटलं कि डोळ्यासमोर हिरवागार परिसर येतो. माणसाचं जंगल म्हणजे काय ? तर मानव निर्मित वनराई. सिपना मॅन मेड फॉरेस्ट पाहण्याचा योग्य आला. वनसंवर्धन हि काळाची गरज होणार हे ओळखून श्री व सौ नारगोळकर यांनी पुण्यात सिंहगड जवळ माळरानावर फुलवलेलं - माणसाचं जंगल. हे जेव्हा ऐकलं तेव्हा वाटलेलं कि असा आपणहुन कसं वसवलं असेल जंगल? परंतु अनेक वर्षांच्या मेहनती नंतर दिसणारं ते हिरवंगार माळरान पाहून खरंच आश्चर्य वाटलं.
इतक्यात कोरोनामुळे वनराई, निसर्ग याकडे आपण जरा जास्त आपुलकीनं पाहु लागलोय खरं . निसर्ग पाहायची अनुभवायची आवड तशी मला आहेच, सिपनाला भेट देऊन अजुन छान वाटलं. आपल्या जवळच इतका छान प्रकल्प आहे हे ठाऊकच नव्हतं.
श्री. नारगोळकरांनी २५ वर्ष पुर्वी हि जमीन घेऊन हा प्रकल्प हि वनराई वसवली आहे. एकंदर २२ एकर जमीन होती. सिपनाला भेट द्यायची तर आगाऊ कल्पना द्यावी लागते. नयना ताई योग्य मार्गदर्शन करतात. आम्ही चौघे जण सकाळी साडे आठ ला येतो असा पक्कं झालं . पोचायला फार शोध शोध करावी लागली नाही. मुख्य रस्त्याला लागून आत गेलं कि लाल रंगाचा बैठा बंगला आपला स्वागत करतो. दारातच मस्त मनमोहक फुलं असलेलं डाळींबाच झाड आहे. आत बसायला छान सोय आहे. मनापासून स्वागत करणारा एक दादा आहे. आम्ही पोचलो तोवर नयना ताई आल्या नव्हत्या मग जागेभोवती चक्कर मारून चिंच, मोगरा, कांचन वृक्ष बघितले. कोरांटी बांबू ची झाडे दिसली. इतक्यातच ताई आल्या. मस्त गप्पा मारत नाश्ता झाला.
दादा बरोबर जंगल पाहायला निघालो. घरामागे मोठ्ठी तुडुंब भरलेली विहीर होती. दोन बाकडे होते. मुक्त बसून घेतलं. निवांत शांत जागेच  सुख वेगळच. पक्ष्यांचा आवाज येतच होता. रानटी झाडांचा, सालांचा वेगळाच वास प्रकर्षानं जाणवत होता.  हिरव्या रंगाच्या अनंत छटा डोळे भरून बघत होतो आम्ही. दादाच्या मागे मागे जात होतो. सूर्यप्रकाश पानांमधून आत येत होता, त्यामुळे बदलणारा पानाचा रंग अवर्णनियच  होता. वाटेत लहान अंडी फुटलेली दिसली, नुकतेच कोणी तरी जन्मले होते. आता मात्र पावले जपून टाकू लागलो आम्ही.
 बाजूला गर्द झाडी मध्ये पाऊलवाट मातीची.. अहाहा ! मुंग्यांसारखी दादाच्या मागे आमची ओळ होती. कोवळ्या पानावर पडलेलं दवबिंदूच दिसणं फार मनमोहक होतं. कांचन वृक्षाला असणारी गोड गुलाबी फुलं प्रथमच बघितली मी. मोठं मोठी सीताफळाची झाडं डवरली होती. एक विशेष आहे इकडचं कि फुलं फळं तोंडात नाहीत ते. ती फक पक्ष्यांच्याच मालकीची. डवरलेली फळ झाडं , ओली झालेली झाडांची खोडं , त्यावरचे कीटक, मुंग्या, कोळ्यांची जाळी , फुलपाखरं गुण्या गोविंदानी नांदत होती.
हिरवा चाफा, सोन चाफा झाडं दादानी दाखवली. आता पक्ष्यांचे आवाज वाढलेले होते. आत्तापर्यंत जमीन पाऊलवाट थोडी कोरडी होती. पण इथून पुढे तिचा ओलावा वाढत होता. चंदनाचे झाड त्याची माहिती घेतली. त्याला फळं येतात ती पक्षी खाऊन विष्ठा पडते तिचा पण यात सहभाग आहे याचा उलगडा झाला. दादा छान माहिती देत होता. निसर्गाची कमालच बघत होतो! 
पुढे ऐक बनवलेलं तळ आहे. प्राणी पक्षी त्याचा छान वापर करतात. उन्हाळ्यात जास्त वापर होत अस्वा. बेहडा, हिरडा झाडं त्यांचं औषधी महत्व समजलं. पुढे होता पांढरा पळस. हा क्वचितच सापडतो. काही झाडं नारगोळकरांची दुरून रोपं आणुन लावली आहेत. केशरी पळस वेगळा असतो, तो सहज सापडतो. रिठा, बेल झाडं दिसली. या वनस्पतीच्या खोडांचा एक विशिष्ठ वास येत होता. भुरकट पांढरट खोडाचे वृक्ष, ताटभर मोठ्या पानांचा भरगच्चं वृक्ष लक्ष वेधत होते.
आता पाऊलवाट निम्मी होत गेली. एकमेकांत गुंतलेल्या वेली जास्त दिसू लागल्या. पाऊलवाटेजवळ पोपटी पण बारीक विविध आकाराची झुडूप होती. फुलपाखरं स्वछंद फिरत होती. आता मात्र फोटो काढण्याचा मोह आवरेना. एक झाड तर वाकवलेल्या काळ्या हँगर सारखी शेंगा असलेलं होत. चालताना सावध चालावं लागत होतं कारण अचानक कोळ्याची जाळी समोर येऊन तुटतील अस होत होतं . आपण सिमेंटच्या जंगलातले कोळी ते माणसाच्या जंगलातले कोळी भिडत होतो. मोहक झाडाची जांभळी फुलं असतात असं दादा म्हटला. सिझन नाही म्हणून फुल दिसली नाही. या फुलांच्या पिठावर आदिवासी लोक उदरनिर्वाह करतात म्हणे. भक्कम मोठी खुरदरी खोडं त्याचा स्पर्श अजूनही आठवतो. नंतर थोडा दगडी उंच सखल भाग लागतो. कुठून कोणतं झाड सुरु होतं आणि संपतं समजतच नाही. दगडी भाग उतरून दादांनी नेलं. त्याजागी बिडी करतात ती झाड होती. त्या पानाची  झाडणी पण करून वापरतात आदिवासी लोक.
नंतर दिसला तो गुळवेल. हा फार ऐकलेला. उंची कमी पण झुपकेदार झाड होती ती होती अर्ध सुपारी ची झाडं. आधी फुलं येतात मग सुपारी. मायग्रेनवर गुणकारी. गिलिया झाडाची माहिती हुकली माझी. पुढे दिसले ते पुत्रंजीवा झाड. तुळशीची माळ करतात ते . नंतर येतात सागवान , आजवर फक्त सागवानी फर्निचर बघितलं होतं, मोठ्या खोडाची झाडं पाहण्याचा योग आज आला. पूर्वी सागवानाचीच पान वापरून पोलिश कसं करायचे ते पण चुरून दादांनी दाखवलं. हल्ली हे वापरात नाही. अगदी ओरिजिनल पोलिश सारखाच रंग.
ऊंदिर पाला खाऊन मरतात ते झाड बघितलं. शेतकरी ही झाडं बांधावर लावतात. ही झाडं दिडशे फुटावरून पाणी खेचुन घेतात. नाव _____

आता पुढे चिखल सुरू आणि चपलांचा आकार बदलु लागतो. साधी चप्पल तर ओळखण्या पलीकडचीच होते. त्यामुळे सावधपणे चालण गरजेच. 
माणसाच्या गुडघ्याइतपत झाडं, लहान लहान पण तीन चार रंगाची फुलझाडं कास पठार सारखी मधेमधे होत. चिमणी वजा बरेच पक्षी दिसु लागले की आपण रमुन जातो. रोजचं आयुष्यच विसरून जातो.  कोणाला गारवा जाणवतो तर कोणाला डास चावतो, कोणाला पक्षी साद घालतात तर कोणाला हिरवळ कॅमेराबंद करायची असते. मजा सुरू होती. रस्ता म्हणजे अगदी -
भिजलेल्या वाटा... 
चिंब पावसाची ओली.....
 या गाण्यासारखाच वाटु लागतो.
चिखलात पांढरे ठिपके असलेले मोठ्ठे पैसे, गांडुळ आणि अनेक नाव ठाऊक नसलेले त्यामुळे न समजलेले असेही प्राणी दिसतात.
पुढे मोहरीच्या शेतेत सारखं शेत त्याच्या पलिकडे गिर गाईंचा गोठा होता.
जवळच वाहणारे चिखलाचे ओहोळ, गोठ्याचा तो टिपीकल वास आसमंतात भरून जाणवतो. भारद्वाज ,कोकिळा अनेक पक्षी लक्ष दिल तर दिसतात.
दादाला सिपनासाठी काम करून ३५ वर्ष झाली आहेत. २००४ साली नारगोळकर सर अंदमान जवळच्या बेटावर गेले होते तिकडे त्सुनामी मधे बेपत्ता झाले असे समजले. पण हार न मानता नयना ताईंनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पुढे चालु ठेवलाय.  सरांचा पाच सहा वर्ष सहवास लाभला त्यातुन ईतकं शिकलो अस कौतुकान दादा सांगत होता. आता काही भाग जाळला लोकांनी, झाडं तोडली म्हणुन कमी झालय जंगल. परंतु ताई हे ठेवणार आहेत ते फक्त आपल्याला ऑक्सिजन मिळेवा म्हणुन! सलामच त्यांना.
पुढे काटेसावर झाड होतं, खोडाला अक्षरशः काटे. या काट्यांपासुन सौदर्यपिटीकांवरचे औषध बनते. यंदाच्या पावसात याच्या फांद्या तुटल्या. पण निसर्ग पहा थांबत नाही सृजनशील तत्व वापरून शिल्लक असलेल्या फांदीला पण पालवी फुटण सुरू झालेलं दिसलं.
नंतर होतं समुद्रफळाच झाडं कावीळीवर रामबाण ऊपाय. त्याच फळ ऊभ लंबगोलाकार दाखवलं दादानी. कर्मळ नावाचा वृक्ष दिसतो पुढे. गणपतीच्या केवड्याची झाडं, रसरशीत काटेरी पोपटी पिवळी पानं.
सीता लंकेत अशोकवनात होती ती अशोकाची झाडं सेम आंब्यासारखी पानं त्याची. जाणकारालाच ओळखता येईल फरक. नंतर एरंडा, मुगली एरंडा, गुलमोहराची जवळजवळ झाडं. बहावा -अमलताश व्वा!  चालताना वाकुन चालाव लागत होतं मधेमधे वेली फांद्या येत होत्या. नंतर होती मोहोगणी, महागणीची झाडं. गर्द झाडीत मस्त फोटो काढले. निसर्गाच्या विविधतेची कल्पना आली. 
दादा पण न कंटाळता सर्व प्रश्नांची उत्तर देत होता. एकाचवेळी पाच पान असलेल झाड वर पाहता चांदण्यांनी भरून गेलेलं छतच दिसत होतं. आणि मोकळा श्वास घेणारे आम्ही खाली.

जास्वंदासारखीच पण बारीक फुलाची झाडं मस्त होती. तेंदुरपत्ताची डार्क पानाची झाडं जास्त लक्षवेधक होती. औषधी शिवण झाड बघितलं. पक्ष्यांच्यां किलबिलाटात शिसम शिसवीची ऊंच झाडं होती. झाडीच्या बोगद्यातुन चालल्या सारखी पायवाट होती. जंगलात थोडा अंधार जाणवला.
साधुंचा दंड कमंडलु बनवतात ती झाडं पाहिली. मोठ्ठी अवाढव्य. भिक्षापात्र बनवत ते झाड दाखवलं, त्याच फळ अर्ध फोडुन ते बनवतात समजलं. सगळच अनोख होतं.
एका पानाच्या टोकातुन तीन पानं फुटलेलं कमालीच झाड दिसलं. काय निसर्ग म्हणावा तरी. नंतर होता कृष्ण वड. पानं त्याची मोठी होताना द्रोणासारखी होतात. भगवान कृष्ण म्हणे यातच माखन खायचे. नंतर होतं अर्जुनारिष्ट्य झाड. त्याच्या सालाचे औषधी वापर समजले. याच साल खोड वेगळच.. जवळच अशोक वेलाची गुंतागुंत त्यात फिकट जांभळ्या फुलांचा सडा झकासच.
अष्टगंध शेंदुर वृक्ष पाहण्याचा योग आला. शेंदुर फळ केशरी आत छोट्या बिया तो शेंदुर, दाखवला दादानी. अष्टगंधाची गोल गोल फळं. 
अत्तराच झाड त्याच साल पान रगडुन सुवासाची अनुभुती आली. नंतर कित्येक वर्षाची लाजाळु पाहायची ईच्छा पुरी झाली. मनातला बालक बाहेर आला आणि मी पान मिटवत गेले. आता ऊजेड वाढलेला जाणवला तो मिचमीच्या डोळ्यांमुळे.
पुढे रीकामे प्लाॅट दाखवले दादानी. 
रबडा चिखल जोड्यांवर मिरवत दीड दोन तासाची सफारी संपली. साडे अकरा झालेले, पाय चपला धुवुन आम्ही परत निघालो.
नयना ताईंना धन्यवाद देऊन एक फोटो काढला. आता डोळ्यासमोर फक्त हिरवच दिसत होतं. गाडीत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या झाडाबद्दलच बोलत होतो.
एकदा निवांत बसुन पक्षी ऐकायला जायच ठरलं. मनातल्या निसर्गाचा ओलावा वाढवुन काॅक्रीटच्या जंगलात दिसेनासे झालो. मात्र मनात माणसान बनवलेलं जंगल घेऊनच!
 
एकदा भेट द्यावी अशीच हि सिपना वनराई आहे.


--
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक 
 
A) https://www.languagetheque.com/diwaliank2021/
 
 B) Maharashtra times Pune & nashik

 
 
17th oct 2021 nashik maharashtra times

Sunday 4 July 2021

चाँद रांगोळी सप्ताह २०२१

चंद्र, चंदा, चांद, चंद्रमा, चंदामामा, चांदोबा, Moon एकाच चंद्राच्या विविध कला तशा भावनांचा छटा.

चांद सप्ताहातुन साकार करण्याचा छोटासा प्रयत्न.. चंद्राची विविध रूपं.
 
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१) सौंदर्य


चाँद की खुबसुरती का जितना बखान किया जाए ऊतना कम ही है|  चाँद हमारी पृथ्वी पर सबसे खुबसुरत चीजों मे से एक है| 

चुपके से चाँद निकलता है।

तरु-माला होती स्वच्छ प्रथम,
फिर आभा बढ़ती है थम-थम,
फिर सोने का चंदा नीचे से उठ ऊपर को चलता है।
चुपके से चाँद निकलता है।

सोना चाँदी हो जाता है,
जस्ता बनकर खो जाता है,
पल-पहले नभ के राजा का अब पता कहाँ पर चलता है।
चुपके से चंदा ढ़लता है।

अरुणाभा, किरणों की माला,
रवि-रथ बारह घोड़ोंवाला,
बादल-बिजली औ’ इन्द्रधनुष,
तारक-दल, सुन्दर शशिबाला,
कुछ काल सभी से मन बहला, आकाश सभी को छलता है।
वश नहीं किसी का चलता है।

हरीवंशराय बच्चनजी कवी
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२) मिलन


निळ्या तांबड्या छटा नभाच्या,
पांघरूनी आभाळ हसते,
त्याच क्षणी या धरतीवरती,
दिवस रात्रीचे मिलन होते ||

अल्प क्षणांकरिता दिन स्थिरतो,
नव्या निशेच्या सवे पहुडतो,
आनंदाच्या छटा गुलाबी,
परतीच्या वाटेवर भरतो ||

थकलेला तो दिनकर नंतर,
हळुहळु निद्राधीन होतो,
आभाळाच्या पटलावरती,
सुरू निशेचा प्रवास होतो ||
÷÷÷÷÷÷÷÷÷

३) विरह


रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।

गीतकार शांताराम नांदगावकर

÷÷÷÷÷

४) बालगोपालांचा चांदोमामा 

चांदोबा चांदोबा भागलास कां, 
लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, 
मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, 
तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, 
चांदोमामा राहिला उपाशी।।

÷÷÷÷÷

५) अंगाई

आपल्या बाळाला झोपवताना थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

÷÷÷÷÷÷÷÷÷

६) प्रेम

श्रीकृष्ण यमुनेच्या पलीकडे रहाणाऱ्या कुब्जेला पहाटेच्या वेळी भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन 

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।
मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।
विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।
अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

कवयित्री इंदिरा संत

÷÷÷÷÷÷÷

७) भक्ती

विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर । चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले । वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।
जन्म मरण नको आता, नको येरझार । नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर । पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

Thursday 24 June 2021

लहानपणची आठवण आमचा वाडा!

वाडा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे वेगवेगळी  कल्पना येते. आमचा वाडा म्हणजे मांगल्य होता. मुलांच्या खळखळाट  हास्यानी भरलेला, शेजारणीच्या घरात सहज ये-जा असणार्या बायकांनी गजबजलेला, एकमेकांच्या मायेनी जोडलेला दुवाच होता. हमरस्ता शिवाजी रस्त्यावर शुक्रवार पेठेतला आमचा हा वाडा, बाहेरून चिरेबंदी कडी कोयंडा दार असलेला. नवख्याला बाहेरून आतली कडी कधी ऊघडता न येणारा, आम्ही  मात्र यात तरबेज होतो.
दारातुन आत आल की एक मोठी काळ्या पाषाणाची एकसंध दगडाची पायरी होती. ऊजवीकडे मिटर होते डावीकडे अंधारी जीना. सांगितल तरच समजणारा. बोळ संपुन पुढं आली की मस्त बंदिस्त अंगण, आजकालच्या भाषेतलं फोर्च सारखं. वर चारी बाजुंनी घराच्या खिडक्या, पदार्थांची देवाण घेवाणही बायकांची होत असे. तिकडे एक मोरी होती. डावीकडे किराणामालाच्या दुकानाची आतली बाजु होती; सरळ पुढं आलं की डावी ऊजवीकडे घरं होती, आहेत अजुनही. या अंगणात लहानपणचे खेळ रंगायचे, मेंदी लावणे, रात्री जेवल की गप्पा मारणे ईकडेच असायचं. ऊजवीकडे जीना वर आमच घर वन रून किचनमधे बावीस वर्ष छान गेली. तशी आठेक बिर्हाडंच होतो पण मजा यायची. मधे परत दोन खोल्या नंतर आमच मागचं अंगण. डावीकडे मोठ्ठी मोरी आहे. सकाळी सगळ्यांचा कामाचा कलकलाट असे ईकडे. नळावरची भांडणं रंगायची. जवळच मोठी विहीर होती, बुजवली नंतर ती. संध्याकाळी  भकास वाटणारं अंगण पण दिवसभर चेहेल पेहेलच. अंगणात कापसाचं, ऊंबराचं, आंब्याच झाड होतं. याच अंगणात होळी पेटवायचो. 
ऊन्हाळ्याच्या सुटीत हे अंगण अड्डाच असायचा. कोण पत्ते खेळायचे, कोणी भांडीकुंडी तर कोणी प्लॅस्टीकचा कॅरम. तेव्हा विश्व मय्यादीत होतं, पण एकोपा खुप होता. दिवाळीचे फराळ, पापड, नागपंचमीची मेहेंदी, रंगपंचमी सगळं एकत्र असायचं. सगळ्या बायका दुपारी कामं करायच्या. वर्कशाॅप भरल्या सारखं चित्र असायचं. कोणी ब्लाऊज शिवत, कोणी फाॅल पिको, तर कोणी ब्लाऊजला हातशिलाई. सुटीत आम्ही खरी कमाई करायचो. महिना संपला की पैसे मिळायचे मग सिनेमाला जायचो.
आमच्या वाड्यात आजुबाजुच्या वाड्यातली मुलं पण खेळायला येत, लेकुरवाळाच होता. लपाछपी, गोट्या, पत्ते, नवावव्यापार असे डाव रंगत. भिंतीवरच्या सावल्यांचे सिनेमे पण बहारदार वाटायचे. ते वाड्यातले माहेरपणाचे दिवस सोनेरीच होते. वाड्याच्या साक्षीन बरीच कार्य पार पडली. कार्य कोणाच असेना वाडाभर आनंद असायचा.
असा आमचा हा आठवणींचा खजिना वाडा मला कायम कायम आठवतो. आठवणीच्या या वास्तुला माझा मनापासुन नमस्कार आणि वाड्याच्या आठवणी सांगता आल्या म्हणुन या ग्रुपचे आभार!
सौ. गौरी पाठक (घाणेकर)

Friday 11 June 2021

ऑनलाइन लग्न एक आगळावेगळा अनुभव

आमच्या नंतरच्या पिढीतलं हे पहिलच लग्न! त्यामुळे सगळेच जाम खुष होतो. मोठ्यांपासुन ते अगदी लहानांपर्यंत भरपुर ऊंच मनोरे आखणं सुरू झालं होतं. दोन्ही घरी आनंदाच ऊधाणच आलं होतं. परदेशातुन मुलं येण्याच्या तारखेवरून लग्नाची तारीख काढली, हाॅल पण बुक झाला. ... आणि अचानक कोरोना नावाचा राक्षस ऊद्भवला. कसलं काय! वधु वराला भारतात येण अशक्य झालं. वर्षभर थांबलो तरी हा राक्षस काही हालेना. यंदाच्या वर्षी तर आम्हालाही परदेशात जाता येईना.

सर्वानुमते मुलांनी परदेशातच मुलांनी लग्न करून घ्याव अस ठरलं. जीवाचा दगड करून हेठरवलं खरंतर.  इकडुनच मुहूर्त काढुन दिला. दोन्ही आई वडिलांची विधीवत लग्न व्हावं अशी इच्छा होती. परदेशातल्या हिंदु देवळात मुलांनी चौकशी केली. ते पण सगळं ठरलं. आता लगीनघाई परदेशात सुरू होती. भारतात दोन घरं मनात हुरहुर घेऊन वावरत होती. पण तरी यु ट्युबवर लग्न बघता येणार हा आशेचा किरण सुखावून जात होता.

मुलाची शेरवानी, मुलीची साडी, शेला, उपरणं, मुंडावळ, टोपी आणि चितळेची आंबा बर्फी मात्र कुरीअरनी परदेशात पोचली. ई-खरेदीचा आनंद मनमुराद घेतला. लाॅकडाऊनमुळे दुकानं जशी ऊघडतील तसं हे घेण्यात आलं. अगदी तुळशीबागेतले बाळकृष्ण अन्नपुर्णा पण घेण्यात आम्हाला यश आलं. ते पण थाटात परदेशात पोचले, देवघरात स्थानापन्न झाले.

मंडप सजवणं, जेवणाचा हाॅल बुक करणं, वधुची तयारी, आमंत्रणं सगळं सगळं मुलच करत होती. देवळात विधी करून रेस्टाॅरंटमधे लंच ठरवलं होतं. सोबतीला होते ते तिकडचे दहा बारा मित्रमैत्रिणी आणि भारतातुन पालकांचे आशिर्वाद! 

आम्ही पालक पण काही कमी नाही, लग्न ऑनलाईन असलं म्हणुन काय झालं?  मस्त आवरून बसलो. व्याही व जवळचे नातेवाईक यांना मिठाई पोच झाली. मेहेंदी काढली. व्हाॅटस अपवर विधीवत आमंत्रणं पोचली. जवळच्या बंद देवळात का होईना पत्रिका ठेऊन आलो. कुलदेवीला कुळाचाराची पुजा आणि ब्राम्हण भोजन करण्यासाठी गुगल पे धाऊन आला.

परदेशातील दुपारी असणारा लग्नाचा मुहुर्त भारतात रात्री सव्वा बाराला होता. घरातले सगळे आवरून अक्षता हातात घेऊन बसलो. दाराला तोरण लागलं, झेंडुच्या माळा सजल्या सुनेच स्वागत म्हणुन पायघड्यांची तयारी झाली.सगळ्या सासवांनी वेलकम सुनबाई व्हाॅटस अप चॅलेंज सारखी तयारी केली. फक्कड मेनु ठरवुन झोमॅटो केलं.

रात्री जागुन लग्न अनुभवण्यात मजा आली. तिकडचे गुरूजी पण छान होते. सगळे विधी इंग्रजीत समजावुन सांगताना ऐकुन हसुन हसुन पुरेवाट झाली. दोन मजली ट्राॅलीत त्यांनी सगळं सामान आणलं होतं. अगदी लाजा होमची पण तयारी होती. गणपती पुजा, सात फेरे, सप्तपदी, कानपिळी, सूर्यदर्शन पासुन लॅपटाॅपवर आई वडिलांना नमस्कार करा इतपत सगळं सगळं छान झालं. एका मैत्रिणीन लगीनगाठ बांधली, एका मित्रानं कानपिळी केली. मधेमधे फोटोग्राफर लॅपटाॅपच्या मधे येत होती. मंगलाष्टका कानावर पडल्या आणि टेक्निकल युगाचे आभारच मानले. 

वरिष्ठांच्या आगाऊ सुचनांशिवाय मुलांनी सुरेख कार्य पार पाडले. मायेची धडधड भारतात थांबली. वधुचे पालक तृप्त झाले आणि वराकडचे आनंदले. झुमकाॅलवर वेलकम वहिनी करून मुलांनी वहिनीच स्वागत केलं.

ईतरवेळी सर्व विधी वर-वधुचे माता पिता पाहु शकत नाहीत. या ऑनलाईन  लग्नात ते नीट पाहता आले. अजिबात न दिसण्यापेक्षा, स्पर्शाची अनुभुती मिळाली नसली तरी मानसिक समाधान
लग्न पाहण्याचं ऊपभोगता आलं.

खरच सुरेखच होता हा पहिला वहिला ऑनलाईन लगीन सोहळा!

शुभं भवतु!

सौ. गौरी पाठक


Tuesday 2 March 2021

पहिली दिलदार भेट

मला मिळालेली पहिली दिलदार भेट

कोणाचाही वाढदिवस असो वा आनंदाचा दिवस असो, मला फुलं (निशीगंध) किंवा गजरा द्यायला आवडतो.फुलांच्या सुगंधाप्रमाणे तो आनंद सर्वत्र पसरावा या हेतुनं. 

परवा माझाच लग्नाचा वाढदिवस होता, सहजीवनाचा वीस वर्षपूर्तीचा आनंद मी घेत होते. ऑफिसमधुन घरी जाताना आज आपणच आपल्याला गजरा घेऊ अस ठरवलं. नेहमीच्या फुलवाल्या दुकानापाशी गाडी थांबवली, वहिनींना म्हटलं की मस्त पैकी बघुन गजरा द्या, ऊद्या पर्यंत टिकेल असा. त्यांनी विचारलं किती देऊ? मी हसत एकच हवाय म्हटलं. त्यावर त्या म्हटल्या की, का हो आज एकच एरवी चारच्या खाली नेत नाही तुम्ही? ऐकुन मला जरा हसुच आलं.

अहो आज कोणासाठी नाही मलाच द्यायचाय. हो का! आज काय विशेष त्यांनी विचारलं. मंद हसत मी सांगुन टाकलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे, म्हटल चला आज आपणच आपल्याला देऊ.

तर वहिनींनी पटकन फुललेला भरगच्च गजराच हातात ठेवला. हा माझ्याकडुन तुम्हाला.... कळीचा ठेवा ऊद्याला. (जो आधी कागदात बांधुन झाला होता). मी हात मागे करत नको म्हटलं, एक घेतलाय की.
त्यावरच वहिनींच ऊत्तर ऐकुन फार फार छान वाटलं.

अहो ताई, हा माझ्याकडुन तूमच्यासाठी खास, मला पण वाटलं तुमचं ऐकुन आपण सतत करत राहतो ईतरांसाठी. घर नोकरी घर. मी पण बघा फुलांची गाडी चालवते पण एक फुल माळणं होत नाही.

आपल्याजवळ काय आणि किती आहे? याला महत्व नाही, पण आहे त्यातुन योग्य कसंआपण ईतरांना/दुसर्यांना देऊ शकतो. तो आनंद घेऊ शकतो हे आज फुलवाल्या वहिनींनी शिकवलं. त्यांचा फुलांचा धंदा असा तो किती असणार.... हातावरचं पोट ते. पण त्यातुन मला झपकन भरगच्च गजरा द्यायची दानत वहिनींमधे दिसली. परमेश्वराची अनमोल देणगी वहिनींजवळ आहे म्हणुनच त्यांच्या फुलांसारख्या त्याही कायम टवटवीत आनंदी असाव्यात.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवशी मिळेलेली ही दिलदार भेट पहिलीच! कायम लक्षात राहिल एशी आहे.

शुभः भवतु!

गौरी पाठक 

Wednesday 24 February 2021

अधिकमास साधना.... जय श्रीकृष्ण

अधिकमास साधना.

गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥

महिनाभर सतत नामस्मरण करावे – यात कुलदैवताचे नामस्मरण,श्रीकृष्णाचे स्मरण करावे.

अधिक महिना पुरूषोत्तम मास म्हणुन ओळखतात. व्रत अस कराव की भावना पोचली पाहिजे.

 म्हणुन त्याच पुरूषोत्तमानं देऊ केलेल्या कलेमार्फत त्याचीच रांगोळी दररोज एक काढुन श्रीकृष्णाने माझ्याकडुन व्रत पुरे करून घेतले.

मी त्या परमेश्वराची आभारी आहे.