प्राक्तन
प्राक्तनात आपण काय काय बघणार आहोत ते आहे. लिहताना वाचताना जितका अवघड शब्द तितकच अवघड त्याचा अर्थ, भवितव्य साठवणारा. आठवडा झाला मनात हा शब्द कुठतरी करवतीच्या पात्यानं लाकूड कापल्या सारखा कुरतडतोय.
आषाढी एकादशीला भगवान विष्णूंकडून भगवान महादेवाकडे सूत्र सोपवली गेली तोच हा दिवस. पहाटेपासूनच मन प्रसन्न होतं. सोमेश्वर देवळातला एकेक कोपरा अनुभवताना मधेच माहेरचा जुना वाडा आई बाबा सवंगडी आठवत होते. तितक्यात एका मोलाच्या सवंगड्याचा निरोप आला, "काळानं वेळ गाठली गं, आई गेली रूपाली".... आषढीत गुंतलेल मन वार्याच्या वेगानं वैकुंठ गमनास निघालेल्या त्या स्त्री तत्वाकडे भिरभिरू लागलं. का धावले मी? ओढ होती ती, बंध होते ते... आपण आपल्या आयुष्यातली विविध स्वभावांतले आयुष्यातले हेलकावे खात झगडत जगलेली व्यक्ती जेव्हा आता दिसणार नाही समजत तेव्हा काळीज थरथरतं. माणूस किती स्वार्थी नाही का हो? बरेच कंगोरे आहेत या वाक्याला.
आपण आपल्या मांसाचा गोळा जन्माला आला की तो लुसलुशीत जणुकाही परमेश्वराचा स्पर्श अनुभवतो ती आईपणाची भावना तत्क्षणी त्या मातेच्या आणि त्या लेकराच्या मनात आत आत नोंद होते. कालांतरान तीच भावना ऊतार वयातल्या आईच्या स्पर्शात जाणवते. हो हे मी अनुभवलय अनेकदा... हीच भावना आता एखाद माणूस कधीही अनुभवणार नाही ही नुसती कल्पनाच भयाण...
काळावर औषध नसतं, जो येतो तो जातोच, शरीर संपतं आत्मा तोच अनंत आहे. सगळ मान्य असलेली मी त्या सवंगड्यास समजवताना तोकडी पडले. "कालच भेटले ग संध्याकाळी तेव्हा पण माझीच काळजी होती तीला..". "लवकर जा, पाऊस जोरात आहे, रीक्षा मिळणार नाही." आपल्या पहिल्या श्वासापासून तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी आईच! हे वाक्य खणखणीत जगत होते मी आज..
सलग काही वर्षे आम्ही तिघी मैत्रिणी आपल्या काळातले दिवस आठवणी ऊजागर कशा राहतील हे पाहण्यासाठी मातृदिनाच्या निमित्ताने तीघींच्या आई वडिलांना एकत्र घेऊन भेटत असल्याने आमची मे महिन्यात नुकतीच भेट झाली होती. नैतिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माणूस किती पुरा पडणार.. पण तरी कुरकुरत न जगता मार्ग काढणे, जमेल तस जेवढ्यांना भेटता येईल तस भेटण हाच ऊत्तम पर्याय आहे.
जसे माझे बाबा गेल्यापासून जवळपास वर्षभर माझ्या चालू घडामोडीबरोबरच त्यांच्या बरोबरच्या घडामोडी सतत मनात होत्या. तसच गेल्या १२ दिवसांत मी आमच्या तिघींच्या तसेच घरच्यांबरोबरच्या, लहानपणच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात होता.
भावनांचा कल्लोळ मनात माजला की तो पेनाचा पूल करून पानावर घ्यायचा म्हणजे मग मी वर्तमानात नीट जगू शकते. हे मला समजलय.
आमच्या आधीची पिढी... अनंत गोष्टी शिकवल्या, मनावर बिंबवल्या आमच्या मनावर.. कोटी कोटी धन्यवाद तर आहेतच पण अखंड ठणठणीत सहवास लाभावा हीच इच्छा आहे. ही खर तर स्वार्थी ईच्छा आहे पण ती पोकळी भरण्याच सामर्थ्य आमच्यात कमी आहे. कोणी काही म्हटल तरी जगाची रीत आई बापाशिवाय माहेरात जीव नाही. म्हणून ही वाक्यं के. बी. निकुंब यांची कोणाच्याही मनास भिडतीलच .. वादच नाही.. "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, ..."
भावनाशीलता, सहनशीलता, चिकाटी, ध्यास असे अनेक गुण आम्हाला आमच्या आईकडून मिळाले. आम्ही भाग्यवान आहोत. पुरेपूर प्रमाणात आम्ही ते पुढच्या पिढीला देण्यासाठी रीते होतच आहोत...
ऊद्या तेरावा दिवस... काकूंना माझा मनापासून नमस्कार ... तुमच्या कडून शिकलेली तीळाची वडी आणि ऊकडीचे मोदक करताना तुमची अखंड आठवण येत राहील...
परमेश्वर सवंगड्यास धैर्य शक्ती प्रदान करोत आणि सर्व नीट पार पडो. माझा ऊद्या योग नाही.
No comments:
Post a Comment