Thursday, 16 April 2026

लवली फिलींग


९ एप्रिल २०२६
माझ्या आयुष्यातील २०१० मधला ट्वीनस डेचा हा आमचा हा फोटो.  खर वाटणार नाही आमच एकमेकींच मोजुन दोन महिन्यांत जे सुत जुळलं तेआज १९-२० वर्ष जवळजवळ आहे तस्सच आहे. मागची दोन वर्ष आम्ही रोज भेटण शक्य नसल तरी ते आहे तसच आहे. आज मिताला ५८ वर्ष सुरू झालं पण ती आजही ४० शीच वाटते मला.
गरजेपेक्षा ईतरांचा विचार जास्त करणारी, कोणाच्या कोणी केलेला पदार्थ त्याची कृती लक्षात ठेवणारी, घरातल्या  मुंग्याना छोटा ढीग साखर उंबरठ्यावर ठेवणारी, जगातलं कोणी येऊ दे गरम करून वाढायची कायम तयारी असणारी, मनातल दु:ख कधीही डोळ्यांच्या किनारीवरही दिसू न देणारी, माझ्या फुसक्या सहलीचे फोटोही दुसर्या दिवशी तितक्याच तन्मयतेनं पाहणारी, कामाला दैवत मानणारी, आद्ध्यात्माची आवड असणारी मिता मला अशीच अखंड ९० पर्यंत पाहायची आहे. हो जाऊ ना आम्ही तेव्हाही ९०-८०च्या असू तरी विष्णू जी की रसोईला. तीच्या माझ्या आयुष्यातील ही १९-२० वर्ष आमच्या आयुष्यातील चंगळ होती. ती सोबत होती तेव्हा तीला बघून बघून मी पण अनेक गोष्टीत तयार झाले ती अजुन  काही गोष्टीत मात्र मला बघून तयार होण बाकी आहे. तीला वाढदिवसाच्या अमोघ शुभेच्छा आणि पापी😘 
तुझीच गौरी
++++
७ एप्रिल २०२६
सुप्रभात! 
ही माझ्या आयुष्यातील बालपणीचा काळ कसा सुखद होता हे सांगणारी आणि त्यात सहभागी असणारी व्यक्ती - छाया काकू! कायम हसतमुख, आल्या गेल्या सगळ्यांच कायम स्वागत करणारी, जे घरात असेल ते मायेन खाऊ घालणारी, इतरांपेक्षा जरा कमी चपळ पण त्याची तमा न बाळगता सतत सतत घरासाठी कष्ट करणारी, आहे त्यात मन:पूर्वक समाधानी राहून जगणारी अशी माझी काकु खुप मायाळु तर आहेच पण ती आजही माझ्यासाठी तश्शीच आहे. मी माॅन्टेसरीत असताना भावे प्राथमिक शाळेत सोडायला येणारी काकू ते कालपर्यंतची म्हणजे तीच्या पुतणीच्या मुलाच्या मुंजीत गेटपर्यंत बरोबर चालत येणारी काकु आहे तशीच आहे. खरतर मला तेव्हाच हा प्रवास आठवला होता..
काहीवेळा आपण सुद्धा खुप काही करतो, जे फार मोलाच असत पण जगात त्याची ऊचल किंवा दखल घेतली जात नाही, झाकोळलं राहत एखादं व्यक्तिमत्त्व पण तस असल तरी त्याचीही दखल घ्यायची गरज न वाटणारं अथवा त्याची गरजच नाही असा विचार करणारी निर्मळ अशी ही खरच मोलाचा साथीदार होती माझ्या काकाची... माझ्या आदराच्या माणसांच्या सूचीत ही कायमच असतेच असते. काकानंतर माझ तीच्याकडे जाणं तस कमी झालय ती बरेचदा घरी नसते. मला वाटल की मी काकाकडे जाऊन तीला भेटण आता शक्य होत नाही. पण मला आनंदच आहे कारण ती आता मस्त फिरतेय, ट्रीप करते, आनंदी राहते. तीचा आजी आजोबा गट भन्नाट आहे. भारीच वाटत मी भेटते त्यांना आणि त्यांच्या प्रवासाच्या कथा ऐकायचा ग्राहकही बनते. हे कान्हाजी माझ्या लहानपणच्या चंदेरी पानावरच्या या सोनेरी माणसाचा आशिर्वादाचा हात मला अनंतकाल लाभावा.
छायाकाकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🫂
तुझीच (चप्पल शेणात भरली म्हणून ती तिथच सोडून एकच चप्पल घालून घरी येणारी आणि हे अस केल म्हणून मला बघून पोट धरून हसणार्या छायाकाकूची लाडकी)
गौरी
++++++
२७ मार्च २०२६
प्रिय कान्हाजींना माझा नमस्कार 
मला या भूतलावर येऊन ईकडच सौंदर्य पाहण विविध नात्यांमधील प्रेम अनुभवणं यासाठी जन्म देणाऱ्या म्हणजेच माध्यम असणाऱ्या आईला अनेक धन्यवाद.आज आईची वयाची ७० वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या कळत्या वयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास ४० वर्ष मी तीला सतत काहीना काही करतानाच बघत आले आहे. बाबांसारखी आद्ध्यात्माची गोडी पण माझ्यात हीच्याच मुळे आली आहे. आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावर ऊभं राहायला शिकावं यासाठीची तीची धडपड आम्हाला मोलाची शिकवण होती. त्या सवयीमुळे आजही मी खंबीरपणे ऊभी आहे. आई... ती स्पष्टवक्ती आहे. भरभरून करण्याची, देण्याची दानत तीच्यामधे आहे. ती स्वावलंबी आहेच पण खमकेपणा आणि सतत कोणाला न कोणाला काहीतरी नोंद दाखवणे या गोष्टींवर ती बाबांच्या माघारी स्वतः च स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून ऊभी आहे. खरतर सहज कोणाला समजेल अस व्यक्तीमत्व अजिबात नाही. त्यामुळे दरवेळी ती वेगळी वाटणं साहजिकच आहे. बाबांच्या आठवणी आम्ही दोघी व ती माझ्या पूर्ण माहेरची चौकट आहे. माझ्या चौकटीच्या या टोकावर लक्ष ठेवा कान्हाजी.
आईला वयाच्या सत्तर वर्ष पूर्तीच्या अनंत शुभेच्छा आणि माझा मन:पूर्वक नमस्कार 🙏🏻
सौ. गौरी पाठक

ड्राफ्ट

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"काकू, मी पास झाले. ९५ टक्के पडले." 
"अरे व्वा! मस्तच. खूपच मस्त. शाब्बास! काकूंकडून पार्टी लागू."
"काय करायच ठरवल पुढे?"
"काकू मला सीए करायचय."
"अच्छा. मस्तच की. होईल सगळ नीट. ये आता घरी."
"हो हो, मी येणारच आहे पुढच्या महिन्यात काकू."
हि  कालची माझ्या आयुष्यातली वाक्यं. काय सुंदर भावना आहे ना! आपलं कौतुक सांगायला आपल्याला आपली माणसं आहेत आणि कौतुक सांगणारे पण आहेत. तो आनंद साजरा करायला, व्यक्त व्हायला कोणीतरी आहे. आपला तो आनंद बघून आनंदी होणार याची खात्री या वाक्यात दिसते. त्या वयात आपलं कौतुक करून पाठ थोपटणारी माणसं असणं,  त्यांचं यावर  "बोल काय हवाय तुला ?" विचारणं. काय मोलाचा क्षण असतो ना हा. हाच तो क्षण मी काल माझ्या पुतणीबरोबर अनुभवाला. दिराशी बोलताना back of the mind मी आठवत होते कि हि वाक्य मी पूर्वी कधीतरी ऐकली आहेत. त्याचा फोन होताच मला माझी आई आणि तिची पुतणी यांचं हेच संभाषण आठवलं. पेढे द्यायला आलेल्या आणि कौतुकाला सरसावलेल्या आईला मी स्वतः बघितलं आहे. आपल्या घरच लेकरू ऊंच ऊडायच्या तयारीत असताना, जमिनीवर कोणीतरी आहे वाट बघायला, कौतुकाला, सहारा द्यायला यामुळे ऊभारी येते आई नेहमीच म्हणायची, आजही म्हणते. आई नेहमीच पास झालेल कोणाचही कळल की भरभरून कौतुक करताना, मस्त मस्त फ्राॅक घेताना, हवं त्या हाॅटेलात खाऊ घालताना बघत आलेय मी. त्यांनाही आज हे वाचताना आठवेलच याची खात्री आहे आणि... अचानक जाणीव झाली बापरे! आपण किती मोठे झालो आणि आपण अगदी आईसारखच बोललो की. आता हे काय शिकवलय का कोणी? तर नाही ते पिढीला बघून आपसुकच अनुसरण केलं गेलय ना. आज फार भाग्यवान असल्यासारखं वाटतयं.  "का?"  ते नाही सांगता येणार....क्रमश:
सौ. गौरी पाठक 
१६ एप्रिल २०२६

वहिनी मी पोचले बरं का!

वहिनी मी पोचले बर का घरी.

काय सुखद कल्पना आहे ही आपण सुखरूप घरी पोचलो याची पोच देणारी व्यक्ती आज आयुष्यात आहे. माझ्या आधीच्या पिढीनी केलेल्या गोष्टींच  हे अनुकरण आहे. आपण कोणाही कडे गेलो तर उपस्थित वशिष्ठांना नमस्कार करणं, तसच ओळखीचे असोत नसोत घरात कोणी मोठ आलं तर पटकन उठून नमस्कार करणं, आपण गावाहून निघताना जिकडे जाणार आहोत तिकडे कोण आणखी असेल तर काही  पोचवायच का? विचारणं. पोचल्यावर "पोचले हं वहिनी मी घरी” ही पोच देणं.

या सगळ्या सोपस्कारांमुळे नात्यांमधे ओलावा राहतो. मला आठवतय माझ्या चुलत मावस बहिणी सुट्टीत आल्या की त्यांची सरबराई करणं, खाऊ घालणं, परत जाताना फ्रॉक घेऊन देणे हे आमची आई करायची. दहावी बारावी पास झाली की आपणहून कौतुकान कपडे घेऊन देणं. कोणाकडे जाताना साधारण आवडीचा अंदाज घेऊन घरचा पदार्थ "हा घे मी तुझ्यासाठी आणलाय." म्हणत हातात देणं. काय सुरेखा संकल्पना होती आदर दाखवण्याची, धन्यवाद मानण्याची. म्हणूनच तर कोणीही न सांगता कोणाच्याही माहेरी हक्कानं भाच्या - पुतण्या नेत असायच्या. मी पण काकूच्या माहेरी, मावशीच्या जावेकडे भरपूर हक्काने गेलेलं आजही मला आठवतय. वाड्यातल्या शेजारणीच्या गावाकडच्या नणंदा - जावांच पण असच. आपलेपणानं घरात वावर असणं. त्यांच्या गावचा टोपल भरभरून वानवळा येणं. अत्यंत सुखद अशी आपलेपणाच्या भावनेची नाळ घट्ट होती.

या सगळ्या गोष्टींचं सुख आणि महत्व का? आणि कस? कोण जाणे लोप पावत चाललय. ते पूर्ण संपुष्टात येणार नाही याची खात्री आहेच पण तरी  हे पुढची पिढी समजू शकेतच अस ठाम म्हणता येत नाहीये. कोणी कोणाकडे दोन दिवस जात नाही की कोण आपल्याकडे येण्यासाठी पण कारण शोधणं कमीच दिसतं. एका खोलीत सहा सात लेकर झोपायचो. आता माझी खोली कुठली विचारणारे ५०% सापडतील. आपण स्वतःहून मी तुमच्या गावात येतोय कामासाठी तर तुमच्याकडे उतरेन म्हणणारी मनं खुप कमी झाली आहेत. यात कोणाच्याही वागण्यावर बोट/ अंकुश ठेवण हा उद्देश नसून एक सुंदर भावना आपुलकीच्या झालरीची कमी होतीय अस वाटतं. 

आपण आपल्या पिढीत म्हणताना पाहिलय की
"या बरं आमच्याकडे, ताईला सांग मी बोलवलय." यावर ताईला सांगण्या आधीच उत्तर येत असे, "हो हो नककी निरोप देईन. येईल ती." आपल्याला कोणीतरी प्रेमाने आग्रहाने हक्काने ये म्हणणारं आहे. याबद्दल नशिबवान समजायचो आपण. आताची पिढी इतकी व्यवहारी झालीय की हा निरोप देणार्याच्या प्रेमाचा, ओलाव्याचा आपुलकीचा शब्द व्यावहारिकद्वष्टीनं  ती घेते आणि सरळ सांगते. "ती खुप Busy असते तीला जमणार नाही." याप्रसंगी तत्काळ त्या बोलण्या मागचा प्रेमळ, हक्काचा, आपलेपणाचा हेतू विचारात द्यावा ही बाब सकारात्मकपणे  निदर्शनास आणून देणे केले पाहिले. या पिढीनं आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं नात्याचं वैभवच बघितलेलं नाही तर त्यांना ही वैचारिक चौकर समजणार तरी कशी?

असे अनेक कंगोरे या "पोचले मी वहिनी बरं का." या  वाक्यामुळे मला प्रकर्षानं लिहावेसे वाटले. आमच्या पर्यंत आम्ही मायेची, प्रेमाची, आपुलकीची गडगंज श्रीमंती अनुभवती आहे त्यामुळे ती या पुढच्या पिढीला मिळणं कमी होताना पाहून जीव तीळ तीळ तुटतो. असो मी नशिबवान आहे कारण मी न विचिरता डायरेक्ट राहायला  येतेय म्हणायला मला माणसं आणि घरं आहेत आणि माझ्या कडे हक्कानं येतोय म्हणणारी व प्रेमानं पोचलो घरी कळवणारी सोन्यासारखी माणसं मला आहेत. आज मी हेच म्हणेन की मी हेच कमावलं.

सौ. गौरी पाठक