Tuesday, 18 August 2026

परंपरा आणि पिढ्या

परंपरा आणि पिढ्या 
मला नेहमीच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा आदर आणि समर्थन करण आवडत आलय. शक्य तितक्या परंपरा आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करतेच कारण माझ्या आधीच्या पिढ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर आणि त्यांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर माझा विश्वास आहे. यापैकी अनेक मूल्यांचे पालन केल्यामुळे मला स्वतःला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत, आणि म्हणूनच आजही त्या परंपरांबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्याच वेळी, पुढच्या पिढीवर याच परंपरा नियम म्हणून लादल्या जाव्यात अशा मताची मी अजिबात नाही. त्याऐवजी त्यांनी त्या परंपरांमागचा अर्थ समजून घ्यावा, त्यांचे महत्त्व अनुभवावे आणि मनापासून त्यांचे पालन करण्याची इच्छा स्वतःहून निर्माण व्हावी असे मला वाटते. काळ बदलतो, पिढ्या बदलतात आणि त्यामुळे पुढच्या पिढीच्या गरजेनुसार काही परंपरांमध्ये योग्य ते बदल किंवा सुधारणा गरजेच्या आहेत त्या होण्यात काहीही गैर नाही. मात्र, प्रथा आणि पद्धती मध्ये थोडा फार बदल झाला तरी त्यांच्या मुळाशी असलेली नैतिकता, संस्कार आणि मूल्ये आपण हलक्यात घेऊ नयेत, हे महत्त्वाचे आहे.

मी माझ्या माहेर सासरच्यांमुळे हे करू शकले, ते करण्यासाठी पोषक परिस्थिती मला लाभली, मी नशीबवान आहे हे पण मी मुद्दाम नमूद करेन. ज्यांना अशी पोषक परिस्थिती लाभली नाही तरी त्या हे करू शकत आहेत खर कौतुक त्यांच आहे. जे केल्याने आपल्याला छान अनुभव आले ते पुढील पिढीने पण करावे, गरजेपुरते बदल करूनच बर का! अस मला वाटतं. काहीच नाही तरी निदान सण, संस्कृती पद्धतींची माहिती तरी असावी. पुढच्या पिढीला पटणारी संस्कृती ची लाॅजिक वाचून मस्त वाटतं. मला पाठव मी पण पुढे पाठवते. एक दोन तर असे अनुभव आहेत की हे मराठीतल इंग्रजी मधे पाठव ते लवकर पचनी पडेल यांच्या. घ्या आता आणखी काय पावती हवी  आपण योग्य विचारधारेतून जातोय याची? 
 
याऊलट माझ्या पाठीमागे काही लोक माझ्याबद्दल नक्की मनात विचार करत असणार याची मला खात्री आहे (अनुभव आहेत गमतीदार) की, “दुसऱ्यांना सल्ला देणे सोपे असते; जेव्हा तेच स्वतःवर येईल, तेव्हा  समजेल." लोकांची अशी मतं आहेत, असणारच आहेत हेही मला माहीत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर त्याचा मला त्रास होत नाही. समाजात वेगवेगळ्या प्रकारची विचारसरणीची माणसं आणि व्यक्तिमत्त्वे असतातच.  वेगवेगळ्या दृष्टिकोनांबरोबर जगायला आपण शिकले पाहिजे. परिस्थितीने त्यांचे ते विचार असणार किंवा असावेत.

मात्र, कधी कधी मला एक प्रश्न पडतो— एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे सकारात्मक योगदान देता येत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण जेव्हा आपल्या हातात सकारात्मक विचार आणि चांगली ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी असते, तेव्हा आपण ती नक्कीच वापरायला हवी नाही का?  अशी माणस नाही का जगात कान्हाजी?

असा सगळा विचार विषयांचा गुंता मी आज मांडला. निखळ मनानं मांडला, कोणाबद्दल ही रोष नाही अशा मनान पानावर ऊतरवला आणि कान्हाजींनी संध्याकाळी एक सुंदर अनुभव दिला तो असा-
संध्याकाळी मस्त ८०-७० वयाच जोडपं भेटलं. कुठाय पत्ता? काय लिहतेयस सद्ध्या? सहज हक्काची वाक्यं.काकु चालूय काहीतरी टुकूटुकू. मग आज नागपंचमी नैवैद्य काय असतो यावर चर्चा झाली. माझी हाताची रंगलेली मेहेंदी दाखवून झाली. काकू म्हटल्या आता आम्ही या सगळ्या तून विरक्ती घेतलीय. बरोबर आहे मी म्हटल काकूंना. काका म्हणतात मधे मधे भेटत रहा गं. पालकाच बी आणलय घेऊन जा. चला मी पळते म्हटल आज पुरी करायची असते. जेवढ जमेल तेवढ मी करते पुढच पुढे बघू. तत्क्षणी काकु म्हटल्या की "करशील करशील आणि पुढची पिढी काय नाही म्हणेल तुला तुमच्या सारखीच उत्साही मिळणार नाही कशावरून? नक्की ती नशिबवानच तुमच्या नशिबात असणारे" अवाक झाले मी काय सांगू.. सकाळी च कान्हाजींना प्रश्न विचारला आणि संध्याकाळी त्यांनी माणूस पेरला की ऊत्तरासकट वाटेवर! 

अहो याची देही याची डोळा म्हणजे हेच का ते?

जय श्रीकृष्ण

No comments:

Post a Comment