Tuesday, 28 January 2025

ऑफिस ऑफिस

माझं ऑफिस माझं माहेरच !
अनेक वर्ष दिवसातले ठराविक तास एकत्र राहून आपण नकळत एका छान नात्यात बांधले जातो. रक्ताचा माणूस पण वेळ पडली तर त्रयस्थ म्हणून सल्ला देण्यास चुकेल पण हे नातं तस नसतं. आपल म्हणणं समजून तो त्यावर व्यक्त होतो, वेळप्रसंगी चूक पण दाखवतो. यांनी दाखवलेली चूक समजते, राग येत नाही. जगात कस वागावं? काय चूक काय बरोबर हे यातूनच समाजत. 
मी पदवीधर झाल्या नंतर नोकरी केलीच पण मोठ्या कंपनीत लागले ती मराठे इन्फोटेकलाच. आमचं ऑफिस गोकुळ होत. 
बावीस पुरुष आणि मी एकटीच महिला होते. मी ग्राफिक डिझाईनर होते. माझ्या वयाचे चार जण होतो, बाकी वयानी अनुभवांनी मोठे होते. मार्केटींगचे पण सगळे सहकारी मस्त होते. 
फिल्डवरचे अनुभव ऐकत लंच होत असे. माझे लग्न झाले तेव्हा रुखवत सामान नेताना पासून सगळी मदत केलेली. लग्नानंतर ऑफिसला आल्यावर उखाणा घेऊनच आत घेतले. इतपत सगळे या सहकार्यांनी केले. पुणे शाखेतली पहिली महिला असल्याचा आजही मला खूप अभिमान आहे. सध्याच्या जीवनात जगताना मुख्य असणारा "ई-मेल" हा कसा करायचा? हे मी इकडे शिकले. अकाउंट पण नव्हतं तेव्हा माझं. शिस्त, काटकसर, तसेच कामावरच प्रेम कसे असावे हे मी इकडेच शिकले. आमची दरमहा १ तारखेला ठाणे ऑफिस ला मीटिंग असायची. सगळ्यांबरोबर मी त्यांच्याच डब्यात चढून आपोआप जायची यायची. लोकलची अजिबात नसलेली सवय हळू हळू झाली. खूप छान सांभाळून घेत असत. रोज रोज नवीन शिकायला मिळायचे. टेलिमाकेर्टिंगच कोणी नव्हतं ते पण काम कमी तिथं आम्ही मध्ये शिकले. हा गुण इकडेच रुजला. एक रजेवर असेल तर दुसर्यांनी न सांगता त्याचे टेबल बघायच आपलं काम समजून. हे आज काल पाहायला मिळत नाही. जरा कुठं वजन जास्त झाले रे झाले कि ताशेरे उमटत जणू काही माझे पालकच होते सहकारी दोस्त लोक. काही जण काळाआड झाले पण बाकीचे अजूनही बोलतो. 
खूप महत्वाची आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे सगळे मॅनेजर, मालक आणि आम्ही एकत्र गोल करून लंच करत असू. आयुष्यात हे पुढे कधीच बघितले नाही. पाच सहा वर्ष आठ आठ तास एकत्र काम करून आम्ही सगळे दुसरे घरचं झालो होतो. सहकाऱ्यांच्या लग्नाला एकत्र जाणे, केळवण, डोहाळजेवण, मुलांचे वाढदिवस साजरे करतानाचे अनंत गमतीचे किस्से. काय मजा असायची. अडीअडचणीत तर आधारच होत असत एकमेकांचे. 
पुण्याबाहेरचे मार्केटिंगचे सहकारी येत असत. तेव्हा जेवणाचे बेत होत असत. ठाणे पुणे ऑफिस ची एकत्र सहल पण जबरदस्त होती. आमचे कंपनीचे मुख्य हेड कडक पण फणस होते. त्यांचे वडील कधी कधी येत असत, ते माणसे बरोबर पारखत. त्यांना बघून मी हे टिपले होते. मराठे इन्फोटेक मध्ये मला जिगरी दोस्त पण मिळाले. जे अजूनही त वरून ताकभात आहेत. ईथं असतानाच मला मुलगा झाला. तेव्हा पण सहकार्यांनी खूप मदत केली. डिरेक्टरी येणार असली कि दिवस रात्र काम होत असायचं. पॅन्ट्रीतल्या गॅस वर कायम चहा होत राहायचा. हे एक सुख होत.
ऑफिसची पुणे शाखेतली माझ्या पाच सहा वर्ष खूप मोलाची होती. लहान वयात लाभेलेलं मार्गदर्शन, प्रेम आपुलकी मी विसरू शकत नाही. मराठे इन्फोटेक (MID) माझ ऑफिस तर होतच पण माझं माहेर म्हणून जास्त होत. आयुष्यात असलेलं हे दुसरं माहेरचं, माझ्या सारखी भाग्यवान मीच असाच म्हणते मी.
गौरी पाठक पुणे
##############

अभिप्राय 

मस्तच!

तुमचा ऑफिस चा पहिला दिवस मला पण चांगला आठवतो
राखाडी रंगाची काठपदराची साडी आणि गुलाबाचे फुल देऊन सगळ्यांचे स्वागत करतानाची तुमची छबी आजही आठवते
ट्रिप ला काढलेले तुमचे फोटो, शिरीन ची डोकं फिरवलेली वेबसाईट आजही नाशिकला जाताना द्वारका सर्कल वरचं त्यांचं ऑफिस पाहिलं की हमखास तुमची आठवण होते
अस म्हणतात की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमच्या जीवनाचा संपूर्ण पट डोळ्यासमोरून जातो
मला खात्री आहे त्या वेळेचा माझ्या प्रवासाचा पट हा 70% MID च्या आठवणींचा असेल
आपण सगळे शेवटच्या क्षणापर्यंत MID चेच असणार हे मात्र नक्की
👍👍
++++
 khup chan vatl junya athvani jaglya zalya

Thursday, 23 January 2025

दृष्टीहीन जगातले डोळस आत्मे.

जय श्रीकृष्ण 
आज गुरुवार लाइट जाणार ठाऊक होतं पण मायनस वन पार्किंगला अंधार असेल अस लक्षात नव्हतं. मोबाईलचा टाॅर्च लावला आणि ज्युपीटर शोधली.  फोन खिशात ठेवला पण किल्ली लावायला कुठ सापडतय. चर्र झालं क्षणभर विचार आला की दृष्टीहीन महिला ज्यांना मी भेटणार होते त्या कस जगत असतील? जेव्हा पासून मी त्या अंध महिलांच्या संस्थेला भेट देणार ठरवल तस मला उत्सुकता वाढत होती.
आणि तो दिवस आला. दहा वाजता निघायच होतं तासाभरात पोचू. उपकार कसे केले दाखवायच म्हणून नव्हे तर ब्रह्मविद्येच्या अभ्यासात शिकले की स्वतः च्या ठणठणीत शरीराचे आभार माना यासाठी अशा संस्थांना भेट द्यायची हा हेतू. आपल्याकडे सर्व अवयव ठणठणीत आहेत, ते नसलेले कसे जगतात पाहून आपण ते मानू शकतो आणि समाजाच देणं पण दिलं जातं.

शिर्डी साईबाबा संस्थांतर्फे चालवली जाणारं हे अंध महिला आश्रमसिंहगड रोडवर आहे.  शोधत शोधत गेलो पण मनात घरघर होतीच. आश्रमासमोर मोठ पटांगण, त्यात सहा सात झोके होते. ईकडे एकत्रित कार्यक्रम होतात हे नंतर समजलं. सहा सात पायरी चढुन वर गेलो तर एक ऊंच प्रसन्न व्यक्तिमत्त्व हसत स्वागत करत समोर. वाॅचमननी तांदूळ आत नेण्यास मदत केली. आत ऑफिस मधे बसलो. ओळख झाली, त्यांनी आश्रमाची थोडी माहिती दिली आणि मागे टिव्ही रूममधे सगळ्यांना बोलवत आहोत तिकडे जा, सांगुन त्या मिटींगला गेल्या.
ऊजवीकडून वळल्यावर सरळ जाताना आधी खोल्या लागल्या. सगळीकडे त्या आपापल्या फिरत होत्या कोणी आधारानं तर कोणी आवाजानं, दोनचार हलक्या धडकल्या पण. आम्ही अचानक मधे होतो त्यांचा तो हमरस्ता होता. आपापल्या आवडीचे सोईचे कपडे घालतात अस दिसलं. दोन खोल्या गेल्यानंतर बैठकीची खोली टिव्ही रूम आली. मोठे तीन सोफे, शेजारी संगमरवरी देवघर, समोर उजवीकडे खुर्च्या मधे सतरंजी. कोणी कुठ बसायच जागा ठरलेली असावी. एक चोवीस तासाची प्रेमळ मावशी प्रत्येकीच नाव घेऊन मदत करत होत्या. जीवाची घरघर थांबुन आता ते गलबलुन आलं होतं. कोण आलय ? नाव काय? विचारल कोणीतरी.  मी नाव सांगितल आणि तुमच्या बरोबर हळदीकुंकू तीळगुळ वाणासाठी आलेय म्हटलं. एका सुरात टाळ्या झाल्या. 
आता सगळ्या जमल्या होत्या. मी जय श्रीकृष्ण म्हणत वर बघता का कुंकू लावते म्हटलं की पटकन वर बघत हसतमुखाने लावुन घेत होत्या. तीळगुळ आईंनी दिला. हात धरून रूमाल देतेय वापरा बरका म्हणत वाण ही देऊन झालं. स्त्री सुलभ स्वभावच तो काठ काठ तपासत कापड हाताळत होत्या. काही जणी अजुनही आपल्याच विश्वात होत्या पण साहजिकच आहे. ईतर सहकारींना पण वाण दिलं.
नंतर मावशी म्हटल्या खाली बसा आणि विचारा काय करता किंवा ईतर बोला त्यांना आवडेल. जरा प्रश्न पडला आधी पण ऐकेकीशी बोलताना जरा बरं वाटलं. एकेक जण काय करतो विरंगुळा म्हणून आणि ईकडं कशा आल्या सांगत होत्या. एक गोष्ट मात्र सारखी होती त्या जीवनात खुष होत्या. अडचणीवर मात करून आनंदी जगायला शिकल्या होत्या. आश्रमातच बरं वाटतं असही काही जणी म्हटल्या. एक जण भजन छान म्हणते मी म्हटल्या आणि सुरेख भजन म्हटलं. गोपालजी कृष्णाच गाण सुमधुर आवाजात त्यांच्यात बसुन ऐकलं आणि कान्हाजी बरोबरच आहेत अस वाटलं. एवढ्यात माझा वाढदिवस आहे हे त्यांना कळलं. गौरीताईचा वाढदिवस आहे अग, ह्या ताईचा वाढदिवस आहे, पटापट  एकमेकींना सांगितलं. टाळ्या वाजवत happy birthday song म्हटलं. एका आजींनी वाढदिवसाच सुरेख गाणं म्हटलं.

काहुर माजतं म्हणजे काय आणि तरी हसत चेहरा ठेवत मला राहण कसबच होतं. आता खरी परिक्षा माझी होती. गौरी ताई आता तु एखाद गाण म्हण त्याशिवाय सोडणार नाही आम्ही.  झालं!  एकही गाण डोळ्यासमोर येईना. शेवटी गुगलबाईला हाक मारली आणि सुंदर ते ध्यान अभंग म्हटला. आणखी काहींशी बोलण झालं. आईशी पण गप्पा मारल्या. एका आजींनी लगबगीने जाऊन क्रोशाचा विणलेला टेबल क्लाॅथ आणला. हा तुझ्यासाठी आहे आवडेल ना?  आधी मी नको म्हटलं पण त्या ऐकेना. आजच सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट हेच होतं. आपल्याकडच काढुन असच सहज समोर आलेल्या अपरिचित बाईला देण्यासाठी मन खुप मोठं लागतं. आज साने आजी आठवल्या.
नंतर आम्ही परत ऑफिस मधे जायला निघालो तर एक काकु हाक मारून चहा आणतेय बसा म्हटल्या. खरं सांगते फार छान वाटलं. ऑफिस च्या शेजारी खोलीत बसायची सोय होती. त्यांनी केलेल्या वस्तू ठेवलेल्या पाहात होतो तोच चहा आला. मावशींनी त्यांचा आश्रमाचा सविस्तर दिनक्रम आणि काय काय मदत लागु शकते सांगितलं.
(त्यांनी केलेल्या वस्तू)
चहा झाल्यावर आश्रम दाखवलं. खोलीत जाऊन बोलण झालं. पलंगावर बसुन मण्यांच काम करताना बघुन आश्चर्य वाटलं, ईकड ४० नंतर सुई ओवताना फ्या फ्या होते म्हणतो आणि यांना बघा. मणी, रंग सामान कस ओळखतात जरा चर्चा झाली. स्पर्श नावाची देणगी आपण वापरतच नाही अस वाटलं. ज्यावर या जगतात.
दृष्टी कमी किंवा नाही तरी आवरून राहणं, आपली कला जपणं बघुन कौतुक वाटलं. नंतर डायनिंग हाॅल, स्वयंपाकाची मोठ्ठी खोली, परसदार, ओपीडी, व्यायामाची खोली दाखवली. परिसर नीटनेटका स्वच्छ होता. मुख्य मॅडमशी बोलुन सगळ्यांना टाटा करत खाली ऊतरलो. सगळ्याच पूर्ण दृष्टीहीन नाहीत काहींना कमी अधिक प्रमाणात दिसतं त्या ईतरांना मदत करतात.
आज अवयवांच महत्व तर समजलच पण आज एकमेकांना साथ देण सांभाळणं आपलस करून घेण पण किती मोलाच आहे हे पण समजलं. नवीन आलेल्या महिलेला त्याच आधी सामावुन घेतात आमच काम फक्त लक्ष ठेवण अस समजलं तेव्हा वाटलं की हा चांगुलपणा धडधाकट जगात पण असायला हवा, वाढायला हवा. तस झाल तर जग आणखी सुंदर होईल.
२१.०१.२०२५

#####
वा वा !!!! गौरी बाई !!! किती छान !!!
सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार की तुम्ही त्या आश्रमाला भेट दिलीत. दुसरे आभार यासाठी कि तुम्ही ते सगळे शब्दबद्ध केलेत आणि ते ही इतक्या सुंदर पद्धतीने. 
एका बाजूला तो आश्रम आणि दुसऱ्या बाजूला तुमचे लिखाण !!!! दोन वेगळे गिफ्ट मिळाले. तुम्ही जे लिहिले त्यातून ते सगळे अगदी तसेच दिसले जसे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले.
हल्ली आपल्या वाढदिवसाला लोक काय काय करतात !! हा विचार न केलेला बरा. कारण टेकनॉलॉजीच्या ह्या प्रवाहात असे काही वाहून जात आहे की, ते परत मिळेल याची काही शास्वती नाही. त्यात तुम्ही, तुमचे पाय ज्या दिशेला वळले, अश्या आश्रमाला भेट दिलीत जे खरे मंदिर आहे. तिथे खरा देव आहे. जसे तुम्ही स्पर्शाची देणगी या बद्दल लिहीले त्याप्रमाणे अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची असून पण माणसाला जाण नाही. प्रत्येक गोष्टीची उणीव त्या ठिकाणी आहे जिथे ती नाही आहे, पण जिथे आहे, तिथे मात्र ती गोष्ट व्यर्थ आहे. कारण असणाऱ्याला किंमत नाही आहे. 
तुमच्या जाण्याने, नक्कीच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा संचारली असेल, आपल्याकडे पण येणारे कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांना झाली असेल आणि सगळ्यात महत्वाचे, की टेकनॉलॉजीच्या जगात माणुसकी टिकून आहे, हे त्यांना समजले असेल. 

तुमच्या या पुढाकारासाठी तुमचे खूप कौतुक. दिवसेंदिवस, तुमचे व्यक्तिमत्व खुलत चालले आहे, लिखाणातून, विचारातून. समोर बरेच दिसते पण त्यातली प्रत्येक गोष्ट बघण्याची नजर प्रत्येकाकडे नसते, जी तुमच्याकडे आहे. असेच करत जा, यातून एक प्रेरणा मिळाली. 
धन्यवाद
******